सागर निकवाडे
नंदुरबार : उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच पाणीटंचाईची तीव्रता देखील वाढत चालली आहे. परंतु सातपुडा परिसरात याची दाहकता अधिकच जाणवू लागली आहे. मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासून जाणवत असलेली पाणी टंचाईची समस्या आता वाढली असून सातपुडा भागातील जवळपास सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भर उन्हात पायपीट करत भटकंती करावी लागत आहे.
नंदुरबार जिल्हा हा सातपुडा पर्वत रांगेलगत असून जिल्ह्यातील बहुतांश भाग हा सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पाणी पातळीत सातत्याने घट होत चालली आहे. परिणामी सातपुड्याच्या अनेक दुर्गम भागांमध्ये पाणी टंचाईचा तीव्र सामना नागरिकांना करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. एप्रिल महिन्यातच वाढलेल्या तापमानाबरोबरच पाणी पातळी खालावली आहे. यामुळे पाण्याची समस्या जाणवू लागली आहे.
विहिरींमधील पाणी पिण्यास अयोग्य
धडगाव तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावांमध्ये विहिरी तयार केल्या आहेत. मात्र या विहिरींनी तळ गाठला असून विहिरींमध्ये हे पाणी पिण्यायोग्य नसल्याची परिस्थिती आहे. काही भागातील विहिरी कोरड्या पडल्या असून यामुळे आपल्या आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरची पायपीट करत पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात दरवर्षीची समस्या
नंदुरबार जिल्ह्यात पाण्याची समस्या दरवर्षीच जाणवत असते. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईला देखील सुरवात होत असते. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गाव, वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असते. खडतर जीवघेण्या रस्त्यातून डोक्यावर हंडा घेऊन डोंगर चढत पाणी आणण्याची वेळ येथील नागरिकांवर आहे. यंदा देखील तीच परिस्थिती असून यावर प्रशासनाकडून अद्याप उपाययोजना नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.