सागर निकवाडे
नंदुरबार : प्रशासनातील वेगवेगळ्या विभागांतर्गत निविदा काढून कंत्राटदाराला कामे दिली जात असतात. कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार बिल सादर करत असतात. मात्र मागील काही महिन्यांपासून या कंत्राटदारांना कामांचे बिल मिळालेले नाहीत. साधारण १२ हजार ५०० कोटी रुपयांचे बिले प्रलंबित असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात आहे. बिले मिळत नसल्याने कंत्राटदार आक्रमक झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय ठेकेदार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, जलजीवन मिशन, ग्रामविकास, नगर विकास, जलसंधारण विभाग आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत काढलेल्या कामांची जवळपास १२,५०० कोटी रुपयांची देयके जून २०२५ अखेरपर्यंत प्रलंबित आहेत. शासनाने मोठ्या प्रमाणावर कामे काढली असली तरी, त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध न केल्याने ठेकेदार मेटाकुटीला आले आहेत.
व्यवसाय ठप्प होण्याची भीती
गेल्या अनेक महिन्यांपासून ठेकेदारांना कुठलेही देयक मिळालेले नाहीत. यामुळे ठेकेदार देखील अडचणीत सापडले आहेत. बिल मिळत नसल्याने मजूर, तांत्रिक कर्मचारी, पुरवठादार, पेट्रोल पंप चालक आणि बँकांचे कर्जदार या सर्वांवर परिणाम झाला आहे. या आर्थिक अडचणीमुळे व्यवसाय ठप्प होण्याची भीती असून, अनेक उद्योगांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.
कामबंद आंदोलनाचा इशारा
नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रक्टर्स वेलफेअर असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निधी त्वरित उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, जर निधी लवकर मिळाला नाही तर सर्व विकासकामे थांबतील आणि ठेकेदारांना साखळी उपोषण व कामबंद आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यामुळे भविष्यात ठेकेदारांच्या आत्महत्यांसारख्या गंभीर घटनांची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.