Nanded News : काल झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यतः केळीचे पीक भुईसपाट झाल्याने बळीराजा पुरता खचला आहे.मुदखेड तालुक्यातील बारड येथील शेतकरी गुणाजी उपवार यांच्या शेतीचे यात मोठे नुकसान झाले आहे. गुणाजी उपवार यांनी यंदा चार एकरमध्ये केळीची लागवड केली होती. त्यांना यासाठी जवळपास तीन ते साडे तीन लाख रुपये खर्च आला. केळीचे पीक चांगल्या स्थितीत आले. या जून महिन्यापासून केळीमार्फत गुणाजी उपवार यांना उत्पन्न मिळणार होतं. जवळपास 15 ते 16 लाख रुपये या केळीपासून उत्पन्न अपेक्षित होतं. (Latest Marathi News)
पण निसर्गाने उपवार यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. गुरुवारी अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. ही गारपीट नसून एक मोठं वादळ होतं. या वादळात उपवार यांच्या केळीची बाग उद्धवस्त झाली. केळी लागवडीसाठी गुणाजी उपवार यांनी सावकाराकडून कर्ज काढलं.आता हे कर्ज कसं फेडावं. याची चिंता उपवार यांना सतावत आहे. कालच्या अवकाळी पावसाने होत्याच नव्हतं झालं. तेव्हा माय बाप सरकारने तात्काळ पंचनामे करून तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी गुणाजी उपवार या शेतकऱ्याने सरकारकडे केली आहे.
अवकाळीचा पंढरपूर तालुक्यातील सात हजार एकरावरील द्राक्षांना फटका
सध्या सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्ष खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने द्राक्षाचे भाव पडले आहेत.
याबरोबरच निर्यात द्राक्षालाही फटका बसला आहे. दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष घड कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर काही ठिकाणी तीव्र उन्हामुळे आता द्राक्षाचे घड फुटू लागले आहेत. गतवर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना द्राक्ष शेतात तोडून टाकण्याची वेळ आली होती. अशीच परिस्थिती यंदाही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.