नाशिकच्या रामकुंडात स्नान करताना चार मुलं पाण्यात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत तिघांना वाचवण्यात यश आलं असून, एका 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. गोपाळ गुप्ता असं मुलाचं नाव आहे.
मुंबईहून सुमारे 40 जणांचा ग्रुप दर्शनासाठी नाशिकमध्ये आला होता. सकाळी गोदावरी नदीत स्नान करून त्यानंतर शिर्डीला जाण्याचा त्यांचा नियोजित कार्यक्रम होता. याचदरम्यान रामकुंड परिसरात गोदावरी स्नान करत असताना चार मुलं अचानक पाण्यात बुडू लागली. मुलांना पाण्यात बुडताना पाहून सोबत असलेल्या नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. या प्रयत्नांमध्ये तिघांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र 14 वर्षीय गोपाळ गुप्ताला वाचवण्यात यश आलं नाही. पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे रामकुंड परिसरात काहीवेळ खळबळ उडाली होती. गोदावरी नदीपात्रात पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न घेता पर्यटकांनी पाण्यात उतरू नये, असे आवाहन प्रशासन आणि जीवनरक्षक दलाकडून करण्यात येत आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात देशभरातून भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी येतात. मात्र नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज अनेकदा येत नाही. या पार्श्वभूमीवर नदीत स्नान करताना विशेष काळजी घेणे, लहान मुलांना एकट्याने पाण्यात न सोडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.