संजय जाधव, साम टीव्ही
Samruddhi Mahamarg Latest News : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मागील काही दिवसांपासून अपघातांचं (Accident) प्रमाण वाढलं आहे. महामार्गावर वाहनचालक अतिवेगाने गाडी चालवत असल्याने टायर फुटण्याच्या घटना घडत आहेत. एकीकडे वाहनचालकांना वाहनाचा वेग ठेवण्याचं आवाहन आरटीओकडून केलं जात असताना, आता आणखी एक दुसरे मोठे संकट उभे राहिले आहे. ज्यामुळे महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढू शकते.
नेमकं काय घडलं?
देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाने महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडली जात आहे. हा महामार्ग देशातील सर्वात वेगवान अशा महामार्गांपैकी एक असणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांच्या घटना घडत आहे. (Latest Marathi News)
समृद्धी महामार्गावर गुरांचा वावर
एक्सेस कंट्रोल" म्हणून ख्याती असलेल्या समृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) मागील काही दिवसांपासून गुरांचा तसेच वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. गुरूवारी औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद किल्ल्याजवळ जवळपास ३० ते ४० जनावरांचा कळप अचानक महामार्गावर आला.
समृद्धी महामार्गावर आल्याने वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ बघायला मिळाली. या कळपाला महामार्गावरून बाहेर काढण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. एका कारचालकाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय.
समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटनेत वाढ
समृद्धी महामार्गावर वाहनाचा वेग १२० ते १३० किमी इतका असतो. अशातच समोरून वन्य प्राणी तसेच गुरं आल्याने वाहनचालकांना वाहनाचा वेग कमी करणे अशक्य होऊ शकते. यामुळे महामार्गावरील अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
विशेष बाब म्हणजे महामार्गावर अचानक जंगली प्राणी येऊ नये म्हणून दोन्ही बाजूने संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे , मात्र तरीही अनेक प्राणी महामार्गावर गुरं तसेच वन्य प्राणी येण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.
समृद्धी महामार्गावर नीलगाईंचा वावर
काही दिवसांपूर्वी महामार्गावर नीलगायींचा वावर वाढला असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला होता. विदर्भातील प्राणी मित्र किशोर रिठे यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. अचानक महामार्गावर आलेल्या कळपामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचं या व्हिडीओमधून दिसत होतं.
समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) नुकतेच लोकार्पण झाले. नागपूर येथील एका भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मार्ग सुरू करण्यात आला. हा मार्ग विदर्भातील तब्बल ३ अभयारंण्यातून जातो. येथील वन्य प्राण्यांना या मार्गाचा धोका होऊ नये, तसेच ते महामार्गावर येऊ नये यासाठी तब्बल ९ ठिकाणी ओव्हर पास आणि अंडर पास बनवण्यात आले आहेत. मात्र, असे असताना देखील वन्य प्राणी हे महामार्गावर येत असून अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.