राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिलीय. एमएसआरटीसीने १३.५६ टक्क्यांनी ही भाडेवाढ केली आहे. यामुळे यापूर्वी केलेली साध्या बसेसची १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द होईल, अशी माहिती देण्यात आलीय. एसटी महामंडळाच्या आर्थिक शाश्वततेसह प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ आवश्यक होती. वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत होता.
त्यात सेवा सुरळीत ठेवण्यासाठी हा भाडेवाढीचा निर्णय गरजेचा होता. दरम्यान पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात वाढ झालीय. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली. तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात लक्षणीय वाढ झालीय, याचा विचार करून भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला.
या भाडेवाढीच्या निर्णयाबाबत बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्यासाठी. यासह एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय गरजेचा आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विश्वास कायम ठेवावा, ही अपेक्षा आहे. राज्यातील ३१ पैकी २२ विभागांना आपला खर्च भागवण्याइतपतही महसूल मिळवता आलेला नाही, असे म्हटले जातंय. वाढत्या डिझेल किंमतीमुळे एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ ३१ जुलैपर्यंत वाढवली होती. राज्यात १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली. त्याला एक महिन्याचीमुदतवाढ देण्यात आली होती.