माघ यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रूक्मिणी मंदीरात चक्रीभजन पार पडले.
औसे मठाचे मठाधिपती सद्गुरू गुरूबाबा औसेकर यांची ही परंपरा आहे.
दरवर्षी माघ यात्रेनंतर औसेकर मठाच्या वतीने मंदिरात चक्रीभजन करून विठुरायाला प्रसन्न करण्याची परंपरा आहे.
सुमारे दोनशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात अमली पदार्थ तस्करीचा धक्कादायक प्रकार
तलवारीच्या म्यानमध्ये ३३ पुड्या; त्यात २०.६९ एमडी ड्रग्ज ठेवले लपवून
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पुरता सुपडा साफ करू असा इशारा माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला आहे.
अकलूज येथे प्रचार सभे दरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यांच्यावर निशाणा साधला.
75 वर्षात माळशिरस तालुक्यात माणस मोठी केली याबरोबरच एका रात्रीतून एकाला आमदार केलं असा टोलाही माजी आमदार राम सातपुते यांना लगावला.
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी रायगडच्या पोलादपुर येथे प्रचारादरम्यान मतदारांना अजब सल्ला दिला आहे. विरोधकांचे पैसे घ्या, मतदान कमळ आणि घड्याळाला करा अस दरेकर म्हणाले आहेत. विरोधकांचे पैसे हारमचे आहेत, खोट्या बिलांचे आहेत अस देखील दरेकर म्हणाले आहेत. दरेकर यांच्या या विधानाने निवडणुकीत होणारा पैशाचा बाजार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वेगवेगळी मतमतांतर पाहायला मिळत आहेत. पक्षविलणीकरणाची चर्चा कार्यकर्त्यांपर्यंत थेट पोहोचली नसली तरी तसेच संकेत मिळत असल्याचे पाहायला मिळते. धाराशिवमध्ये अजित पवारांचे विश्वासू असलेल्या सुरेश बिराजदार यांना स्वतः अजित पवार यांनी साहेबांच्या प्रमुख कार्यकर्त्या सोबत चर्चा करा त्यांना आपल्याला सोबत घ्यायचा आहे अशा सूचना केल्या होत्या. त्यासाठी अजित पवारांनी दोन वेळा फोन केल्याची माहिती सुरेश बिराजदार यांनी दिली. दोन्ही पक्ष एकत्र येणार का याबाबत आमच्यासारखे कार्यकर्त्यांना माहिती नाही असंही बिराजदार म्हणाले.
जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रायगडच्या पोलादपुरमध्ये शिंदे सेना आणि भाजपमध्ये थेट लढात होताना दिसत आहे. पोलादपुर भाजप नेते प्रविण दरेकर यांचे गाव असल्याने निवडणुकीच्या या रणधुमाळीत प्रवीण दरेकर भाजप आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. दरेकर यांनी थेट शिंदे सेनेला आवाहन दिलं आहे. प्रचार सभांना होणारी गर्दी आणि भाजपमध्ये होणारा प्रवेश यावर लक्ष केंद्रीत करीत आमच्या सर्व जागा निवडून येतील आणि आमची सत्ता प्रस्थापित होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जालन्यात बँकेची आयडी का सुरू करत नाही असं म्हणत चौघांनी बँकेच्या व्यवस्थापकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जालन्यातील शेलगाव येथील ग्रामीण बँकेमधील ही घटना असून मारहाणची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.ढालेश्वर मदनलाल बोचपे असं मारहाण झालेलं शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे. दरम्यान मारहाणी प्रकरणी चार ज्ञात आरोपीसह चार ते पाच अज्ञात आरोपीं विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बदनापूर पोलीस अधिक तपास करत आहे.
कुडाळ तालुक्यातील ठाकरे सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नेरुर गावात माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. नेरूर गावच्या सरपंच भक्ती घाडी यांच्यासह उपसरपंच व ठाकरे सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
उन्हाळ्याची चाहूल लागताच अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांवरील पाण्याच्या उपलब्धतेकडे शेतकरी व प्रशासनाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सध्या जिल्ह्यातील एक मोठा, सात मध्यम आणि ४८ लघु अशा एकूण ५६ सिंचन प्रकल्पांमध्ये सुमारे ६८ टक्के जलसाठा उपलब्ध असून,ही स्थिती समाधानकारक मानली जात आहे.मात्र उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने सिंचनासाठी पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सद्यस्थितीत प्रमुख धरणांतील पाणीसाठा समाधानकारक असला,तरी शेतीसह नागरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी या प्रकल्पांवर असल्याने येत्या उन्हाळ्यात मागणी वाढणार आहे. काही मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा तुलनेने कमी असल्याने त्या भागात पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही.जलसंपदा विभागाने आगामी काळात पाण्याचा काटेकोर व नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन केले असून, सिंचनासाठी उपलब्ध पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले आहे. अन्यथा, एप्रिल–मे महिन्यांत सिंचन प्रकल्पांवरील ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ज्या डोंगरावर गाथेची रचना केली असा भामचंद्र गडाला बिल्डर आणि भू-माफीयांची नजर लागली आहे आणि त्यामुळे या डोंगराच अवैधरित्या उत्खनन सुरू आहे. संत तुकोबारायांची संतभूमी असलेला भामचंद्र गड वाचवण्यासाठी आता संतभूमी संरक्षण संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वारकऱ्यांचा मेळावा घेऊन येत्या 10 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात भामचंद्र गड व परिसरात सुरू असलेलं अवैध उत्खनन थांबवण्याच्या मागणीसाठी लाखो वारकऱ्यांना मुंबईत येण्याच आवाहन संतभूमी संरक्षण संघर्ष समितीकडून वारकऱ्यांना करण्यात येत आहे. काल बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात वारकऱ्यांच्या सभा पार पडल्या. यात 10 मार्च रोजी भामचंद्र गड ही संत तुकोबारायांची भूमी वाचवण्यासाठी या आंदोलनात मुंबई येथे येण्याचआवाहन अनेक ज्येष्ठ कीर्तनकार व महाराजांनी वारकऱ्यांना केलं. यामुळे मात्र आगामी काळात भामचंद्र गड व परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननाचा मुद्दा गाजण्याची चिन्ह आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या बॉर्डरवरील टोल नाक्यावर सुरू असलेल्या अवैध वसुलीचा प्रकार खासदार पडोळे यांनी उघडकीस आणला आहे. या संदर्भात त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना भररस्त्यात जाब विचारला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून गोंदिया सीमावर्ती भागातील टोल नाक्यावर वाहनधारकांकडून, विशेषतः ट्रक आणि इतर व्यावसायिक वाहनांकडून अवैधपणे पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी खासदारांकडे येत होत्या. याची शहानिशा करण्यासाठी खासदार पडोळे यांनी प्रत्यक्ष टोल नाक्याला भेट दिली. यावेळी त्यांना अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्या.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खासदार प्रशांत पडोळे अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी टोल नाक्यावरील ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.गरिबांकडून आणि ड्रायव्हर्सकडून पैसे वसूल करण्याचे धाडस कुणी दिले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यावेळी खासदारांनी स्पष्ट केले की, काही स्थानिक 'धाब्यांवर' बसून वसुलीचे रॅकेट चालवले जाते. हे सर्व प्रकार तत्काळ बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. खासदारांच्या या 'ऑन द स्पॉट' कारवाईमुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.
अजित पवारांच्या सासुरवाडी असलेल्या तेर जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज लढत होत असताना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी उमेदवार कीर्तीमाला महादेव खटावकर यांनी जाहीर सभा आणि रॅलींपासून दूर राहत साधेपणाने प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आणि सक्षणा सलगर यांच्यासोबत जोरदार सामना होत असतानाच,ठाकरे गटाकडून दुखवटा पाळण्याची भूमिका घेतली गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.या निर्णयामागचं कारण सांगताना ठाकरे गटाचे नेते महादेव खटावकर म्हणाले, “अजित दादांवर आमचा विश्वास होता. दादांनी तेरसाठी काम केलं आहे आणि पुढेही करतील, अशी आमची अपेक्षा होती.” आता या निर्णयाचा नेमका परिणाम तेर गटाच्या निवडणुकीवर काय होणार, आणि या हाय व्होल्टेज लढतीत मतदार कोणाच्या पारड्यात कौल देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गावामधून आंबागड किल्ला पाण्यासाठी आलेल्या दोन तरूणांचा आंबागड गावानजीकच्या बावनथडी डावा कालवा क्रमांक एकच्या नहरात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. जागेश्वर यशवंत वाढिवे (वय २९) व दीपक अरविंद वाढिवे (वय २६) अशी मृतांची नावे असून हे दोघेही रामपुरी (ता. लाखनी) येथील रहिवासी आहेत.माहितीनुसार, जागेश्वर व दीपक हे दोन्ही तरूण एकाच गावचे असून नात्यांमध्ये आहेत. आपल्या दुचाकीने आंबागड किल्ला बघण्याकरिता आले होते. किल्ला बघितल्यानंतर बाजूने जात असलेल्या बावनथडी कालव्याच्या प्रवाहात पोहण्याची इच्छा झाल्याने ते कालव्यात पोहण्यासाठी उतरले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.
लोणार सरोवरातील वाढत्या पाणीपातळीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी लोणार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून सरोवराची पाणीपातळी २० ते २५ फूटांनी वाढल्याने पाण्याची क्षारता व pH स्तरात मोठा बदल झाला असून दुर्मिळ जैवविविधता धोक्यात आली आहे. पाणी गोड होत चालल्याने मासे निर्माण झाले असून भविष्यात सरोवराचे मूळ स्वरूप नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे...पाणी वाढल्यामुळे आई कमलजा माता मंदिर, गैबनशहा वली दर्गा व इतर प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली असून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. शहराचे सांडपाणी व गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्रोत अडवून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरणे, कायमस्वरूपी STP प्रकल्प राबवणे व सरोवर संवर्धनासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा पहिला पवित्रा म्हणून संपूर्ण लोणार शहर बंद ठेवण्यात आले आहे.
राज्यात खळबळ उडविणारा बनावट जन्म नोंदीचा गुन्हा यवतमाळ शहरात दाखल झाला.यानंतर थेट अप्पर पोलीस महासंचालक सायबर यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली विशेष तपास समिती तयार केली.गुन्ह्यातील 13 आरोपींचा शोध घेऊन त्यांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली.यामध्ये सीआरएस पोर्टल हॅक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा समावेश असून दोन हजार रुपये घेऊन बनावट जन्म प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात दिले जात होते,असे प्रमाणपत्र घेणाऱ्या तिघांना मुंबई, ठाणे इथून अटक केलीये. हॅकरने मोठे नेटवर्क तयार करून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हे नेक्सस सुरू केल्याचे तपासातून पुढे आले आहे
वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाढत असलेल्या डिझेल चोरीच्या घटनामुळे वाहनमालक व चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्या पार्श्वभूमीवर वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत डिझेल चोरीतील तीन आरोपींना अटक केली. तीनही आरोपी जालना जिल्ह्यातील असून आरोपींकडून 12 हजार रुपये रोख व चारचाकी वाहन जप्त केले.
कारंजा शहर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणात प्रतिक प्रभाकर साळवे (वय १९, रा. दिवरा ता जाफराबाद जि जालना) व सागर रमेश हिवराळे (वय २८, रा. सिंधी, ता. जाफराबाद, जि. जालना) या आरोपींना अटक केली, तसेच मालेगाव पोलिस ठाण्यात समृद्धी महामार्गाशी संबंधित दाखल दोन प्रकरणांचा तपास करत पोलिसांनी अलीम खान मुस्ताक खान पठाण (वय २३, रा. टेंभुर्णी, ता. जाफराबाद, जि. जालना) याला अटक केली आहे.
अमरावतीच्या वेळ वलगाव -दर्यापूर मार्गावर दोन चार चाकी वाहनांचा अपघात..
अपघातात पाच प्रवासी झाले जखमी; दोन वाहनांची आमने-सामने धडक झाल्याची घटना....
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू रात्रीची घटना।
यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने रिक्त असलेल्या 161 पदांची भरती करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.11 फेब्रुवारी पासून पद भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळे मैदानावर उमेदवार पदभरतीची रंगीत तालीम करताना दिसत आहे. पोलीस शिपायाची 150 तर बँण्डस्मनची 11 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच पोलीस अधीक्षक कार्यालयाने नियोजन सुरू केले आहे.दरम्यान पद भरती केवळ 161 जागांसाठी होत असली तरी या पदासाठी तब्बल 14 हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
अहेरी तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, वांगेपल्ली येथे मोबाईल चोरीच्या संशयावरून तब्बल शंभर विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुमसर तालुक्यातील खापाते हसारा या मुख्य रस्त्यालगतच्या शिवारात पट्टेदार वाघिणीने बछड्यासह दर्शन दिल्याची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. या बातमीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घटनेबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो व व्हिडिओंबाबत वनविभागाने साशंकता व्यक्त केला आहे. तुमसर शहराला हा परिसर लागून असल्याने अनेक नागरिकांनी खापा-हसारा रस्त्याकडे धाव घेतल्याचे दिसून आले.हसारा-खापा रोडवर शेतशिवारात वाघ आणि त्याचा बछडा दिसल्याची चर्चा सुरू झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना आणि मजुरांना वन्यप्राणी दिसल्याने वाहतूकही ठप्प झाली होती. वाघ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या घटनास्थळाकडे धाव घेतली, ज्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. एका प्रवासी याने आपल्या मोबाईल मध्ये हा व्हिडिओ काढला असला तरी वनविभाग हा व्हिडिओ ची पुष्टी करत नसून हात काढत आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल राहंगडाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना तातडीने गस्तीसाठी पाठवण्यात आले असून, पगमार्क शोधण्याचे काम सुरू आहे, परंतु या घटनेबाबत जो फोटो प्रसारित होत आहे, त्यावरून वनविभागाने शंका उपस्थित केली आहे. फोटोत दिसणारा परिसर आणि तो प्राणी नेमका वाघच आहे का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असलेला सोनल प्रकल्पातील पाणीसाठा सध्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढल्यामुळे कालव्यावरून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे. या वाढलेल्या उपशाचा थेट परिणाम प्रकल्पातील साठ्यावर दिसून येत असून,आतापर्यंत सुमारे ४० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. सोनल प्रकल्पावर परिसरातील अनेक गावे अवलंबून असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही याच प्रकल्पातून केला जातो. मात्र पाण्याची मागणी वाढत असताना साठा वेगाने कमी होत असल्याने येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.