रायगडच्या कर्जतमधील रेल्वे पुलांच्या कामावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवाद रंगला आहे. या कामांवरून मावळचे शिंदेसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मी कोणाच्याही कामाचं श्रेय घेत नाही, असं स्पष्ट करत श्रीरंग बारणे यांनी महारेलच्या कामाची पद्धत समजावून सांगितली. तटकरेंना कामाची पद्धत माहिती नसेल, असं म्हणत बारणे यांनी आपण तटकरेंपेक्षा सिनियर असल्याचंही वक्तव्य केलं. तसंच, भरत गोगावले यांनी तटकरेंना ही कामाची पद्धत समजावून सांगावी आणि चुकीचा भ्रम पसरवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
बारणे यांच्या या टीकेनंतर आता सुनील तटकरे काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मात्र, नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या तटकरे यांनी यावेळी संयमाची भूमिका घेतली. श्रीरंग बारणे आणि माझे चांगले संबंध आहेत. आम्ही चांगले मित्र आहोत. आप्पा बारणे हे माझे मित्र असून ते माझ्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करतील, असं मला वाटत नाही, असं म्हणत सुनील तटकरे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मात्र, रेल्वे पुलांच्या कामाचं श्रेय नेमकं कुणाचं, यावरून दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालेला हा वाद भविष्यात आणखी रंगण्याची शक्यता आहे. बारणे यांच्या वक्तव्याला तटकरे कधी आणि कशा पद्धतीने उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.