Maharashtra Weather Alert  Saam TV news
महाराष्ट्र

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, २४ तासात १० जणांचा मृत्यू, अनेकांचा संसार उघड्यावर

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे गेल्या २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात २४ तासांत पडलेल्या मुसळधार पावसात १० जणांचा मृत्यू

  • मराठवाड्यात विक्रमी पावसाने जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडले.

  • नाशिक, धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्यांत विविध कारणांनी नागरिकांचा मृत्यू

  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत उपाययोजनांचा आढावा घेतला आहे.

महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात पावसाशी संबंधित घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्याच्या विविध भागातून ११,८०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. मुंबईत शनिवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे तर मराठवाड्यासह घाटमाथ्यावर मागील आठवड्यापासून धोधो पाऊस पडत आहे.

दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यावर्षी सर्वाधिक प्रमाणात पाऊस कोसळला आहे. गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी धरणाचे सर्व दरवाजे उघडले. पुराच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथून सुमारे ७,००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९६ मिमी पाऊस पडला.

अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रात १६ एनडीआरएफ पथके तैनात आहेत, पुणे मुख्यालयात दोन अतिरिक्त पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा, सोलापूरसह आठ जिल्ह्यांमधील पावसाळी परिस्थिती आणि मदत उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यात चार मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी तीन जण घर कोसळल्याने झाले आहेत. तर धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी दोन मृत्यूंची नोंद झाली आहे आणि जालना आणि यवतमाळमध्ये एका मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.

नाशिकमध्ये, मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ज्यामुळे रामकुंड परिसरातील काही मंदिरे पाण्याखाली गेली. शहरातील पुराच्या भागातून २१ जणांना वाचवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हवामान विभागाने जिल्ह्याला 'रेड अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे रविवार आणि सोमवारी जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा शक्यता आहे. तर मंगळवारी आणखी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT