Cyclone Fengal News : फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे. राज्यातून थंडी गायब झाली असून पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झालेय. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात ढगाळ वातावरण असेल.
'फेंगल' चक्रीवादळ शनिवारी रात्री उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आदळले. 'फेंगल' चक्रीवादळ, आदळताच लगेचच विकसनाच्या उलट पायरीने झुकत, च. वादळ कमकुवत होत त्याचे आज हवेच्या अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात २ ते ४ डिसेंबर( सोमवार ते बुधवार) असे तीन दिवस केवळ ढगाळ वातावरण राहून, झालाच तर, भाग बदलत, अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः हा परिणाम, आज सोमवारी (२ डिसेंबर ला) दक्षिण महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली ह्या महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यात अधिक जाणवेल. तर मंगळवार-बुधवारी (३ व ४ ला) नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली ह्या चार जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात चार दिवस ढगाळ वातावरण
अमरावती जिल्ह्याचा पारा 13 अंशावरून 17 व 18 वर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्ह्यातून थंडी पार गायब झाली आहे. अमरावतीसह विदर्भात ढगाळ वातावरण असल्याने काही ठिकाणी हलक्या व तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावतीसह विदर्भात तीन ते चार दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. या प्रतिकूल वातावरणामुळे मात्र तूर व हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे तर थंडी जरी गायब झाली आहे.
सोलापुरात पावसाची शक्यता -
मागील काही दिवसांपासून सतत खाली येणाऱ्या तापमानाच्या पाऱ्याने सोलापुरात थंडी कमी झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारवा कमी झाला आहे. त्यामुळे पहाटे ऊबदार कपडे घालून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाल्याचं चित्र सोलापुरात दिसून येतय. मागील चार दिवसात ६ अंश सेल्सिअसने तापमानात घट झाली आहे. सध्या सोलापुरातील तापमान २३ अंश सेल्सिअस असल्याच पाहायला मिळत आहे. पुढील कांही दिवस सोलापूर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सोलापुरातील थंडीची लाट ओसरतानाचे चित्र दिसून येत आहे.
बदलत्या वातावरणाचा तूर पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका...
वाशीम जिल्ह्यात मागील काही दिवसापासून वातावरणात बदल होत असून सर्वत्र ढगाळ वातावरण वाढत असल्यामुळे बहरलेल्या तुर पिकाला फटका बसण्याचा धोका वाढला आहे. सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे शेंगाची मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
खरिपातील अतिवृष्टीमुळे आधीच नापिकी झाली अशातच पुन्हा बदलत्या वातावरणाचा फटका तूर पिकांना होत आहे. सध्या तूर पिकाला मोठ्या प्रमाणावर शेंगा लागलेल्या आहेत. अशातच ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे प्रमाण वाढत आहे. धुक्यामुळे लागलेल्या कोवळ्या शेंगा, फुले गळत आहेत. शेतकऱ्यांनी तूर पिकाच्या व्यवस्थापनासाठी खर्च केला. बहुतांश शेतकऱ्यांनी ओलित करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले; मात्र, आता झालेल्या वातावरण बदलामुळे उत्पादनात घट येईल. असे सांगितले जात आहे. अचानक बदललेल्या धुक्याने सुद्धा तुरीचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.