Uddhav Thackeray Speech Live : शिवसेनेत उभी फूट पाडूनही भाजप आणि शिंदेंचे पोट भरलेले नाही. आज भाजपकडे स्वतःचे बहुमत नाही, म्हणूनच ते आमची पोरं पळवत आहेत. तुमच्या वांझोट्यापणावर आधी तुम्ही उपचार करा," अशा अत्यंत तिखट आणि शेलक्या शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि बंडखोरांचा समाचार घेतला. शिवसेनेत दुसऱ्यांदा मोठी फूट पडल्यानंतर जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे आक्रमक झाले होते. त्यांनी केवळ पक्षांतरावरच बोट ठेवले नाही, तर ठाकरे कुटुंबावर होणारे वैयक्तिक आरोप आणि सत्तापिपासू वृत्तीवर घणाघाती हल्ला चढवला. ते शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनी कार्यक्रमात बोलत होते.
'मी भेटत नव्हतो, तर मग निवडून कसे आलात?'
उद्धव ठाकरे लोकांना भेटत नाहीत, या विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, "मी कुणाला भेटत नव्हतो, तर मग तुम्ही निवडून कसे आलात? प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मी ६ ते १० सभा घेतल्या होत्या, म्हणूनच तुम्ही निवडून आलात. उद्धव ठाकरेला किंमत नाही, तर 'उद्धव बाळासाहेब ठाकरे'ला किंमत आहे आणि याचं मला पूर्ण भान आहे." तसेच, शिवसेनेच्या स्थापनेचा क्षण आजही माझ्या डोळ्यांसमोर असून, तुमच्या सगळ्यांपेक्षा मी ज्येष्ठ शिवसैनिक आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
'दुसऱ्याचे बाप चोरणारी ही कुठली औलाद?'
'मातोश्री' आणि ठाकरे कुटुंबावर होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना उद्धव ठाकरे भावूक आणि आक्रमक झालेले पाहायला मिळाले. "मातोश्रीवर शिंतोडे उडवतात, मला कळत नाही ही कुठली औलाद आहे? ही भेसळ कुठून आणली? यांना स्वतःचा पक्ष चालवण्यासाठी दुसऱ्याचे बाप चोरावे लागत आहेत. मातोश्रीवर आणि ठाकरे कुटुंबावर जळणाऱ्यांना आम्ही काय भोगलंय, हे ठाऊक तरी आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी केला. माझ्यावर, पत्नीवर, आदित्य आणि तेजसवर सातत्याने आरोप झाले, पण संकट काळात यांच्यापैकी एक तरी पुढे आला का? असा सवाल करत, दगाफटका झाला म्हणूनच मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली, असे त्यांनी स्पष्ट केले.
"आज भाजपकडे २ तृतीयांश बहुमत नाही. तुमच्या वांझोट्यापणावर तुम्ही उपचार करा, आमची पोरं कशाला पळवता? तुमची पोरं पळवणारी टोळी आहे, पण आमची काही पोरं पुरवणारी टोळी नाही," अशा अत्यंत तिखट शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.
बंगालमध्ये फौज, मग मणिपूरमध्ये का नाही?
केंद्राच्या राजकारणावर बोट ठेवत त्यांनी पश्चिम बंगाल आणि मणिपूरच्या परिस्थितीची तुलना केली. "एका महिलेला (ममता बॅनर्जी) हरवण्यासाठी यांनी दोन अडीच लाख सीमा सुरक्षा दल बंगालमध्ये घुसवले. हरल्यानंतर देशात काय प्रतिक्रिया उमटली? बंगालमध्ये सुरक्षा दल घुसवू शकता, मग मणिपूरमध्ये का नाही पाठवले? हिंमत असेल तर पाकिस्तानात घुसा ना! देशाच्या हिताचे निर्णय घ्या, अशी तोडफोड कशाला करता?" असा थेट सवाल त्यांनी मोदी सरकारला केला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपच्या विचारसरणीवर हल्ला केला. "यांचे जे सुरू आहे ते हिंदुत्व नाही, तर भोंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व आहे," असे ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.