अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Maharashtra Politics : 'एकनाथ शिंदेंची गरज संपली आहे का? ते बाजूला व्हावेत असा प्रयत्न होतोय का? उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी शिंदेंना पुढे आणले आणि आता शिंदेंना संपवण्यासाठी नवा 'उदय' पुढे होईल', असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. यावर पुढे उदय सामंत यांनी पलटवार देखील केला. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे नाराज असल्याचेही म्हटले जात होते. तेव्हा शिंदेच्या सेनेमध्ये दोन गट पडल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
गटबाजीच्या चर्चांवर आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "शिवसेनेमध्ये गटबाजीचा कुठलाही विषय नाही. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही काम करत आहोत. गटबाजीचा विषय नाही. आमचा गट एकच, शिंदे साहेब आणि धनुष्यबाण." येत्या १३ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकला आभार दौरा असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेमधील गटबाजीच्या मुद्यामुळे राजकारण तापले होते. काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी नवा 'उदय' पुढे होईल असे विधान केले होते. त्यावरुन उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. 'विजय वडेट्टीवार हे स्वत:चा प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे घेऊन गेले होते. त्यांना कुणामार्फत फोन गेला, कोणाशी चर्चा झाली याची माहिती माझ्याकडे आहे.' असे विधान सामंत यांनी केले होते.
वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील याप्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. यामुळे शिंदे गटामध्ये दोन गट निर्माण झाले आहेत, गटबाजी सुरु आहे अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. उदय सामंत यांच्यानंतर आता दादा भुसे यांनीही शिंदेसेनेत सर्वकाही अलबेल असल्याचे संकेत दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.