मनोज जरांगे पाटील ठाम, मोर्चा उद्या सकाळी १० वाजता आंतरवली सराटीतून निघणार.
सरकारकडून मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती जरांगेंनी फेटाळली.
जरांगे म्हणाले, चर्चा आता थेट मुंबई आझाद मैदानातच होईल.
मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. २७ ऑगस्टला ते आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेला रवाना होणार आहे. मुंबईकडे निघणाऱ्या या मोर्चामध्ये मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईकडे मोर्चा घेऊन येऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
मनोज जरांगेंशी वाटाघाटी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली. याआधी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी मनोज जरांगे यांच्याकडे मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली. पण मनोज जरांगे हे मोर्चावर ठाम असून उद्या ठरल्याप्रमाणे मोर्चा निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी नुकताच मनोज जरांगे यांची भेट घेतली. मोर्चाची तारीख पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली. पण मनोज जरांगे पाटील यांनी माझी त्यांच्यासोबत काहीच चर्चा झाली नाही असे सांगितले. मनोज जरांगे यांनी सरकारला स्पष्ट सांगितले की, 'आम्हाला कोणताही एक रस्ता द्या. हजार रस्ते आहेत त्यापैकी एक रस्ता द्या. मी मोर्चावर ठाम आहे. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. ३ महिन्यांचा वेळ द्या म्हणाले. आता उद्या सकाळी १० वाजता मराठा समाजाचा मोर्चा शांततेत निघणार आहे.'
मनोज जरांगे यांनी सांगितले की, '४ महिन्यापूर्वी मी या तारखेची घोषणा केली होती. फडणवीसांना आम्ही दोन महिन्यापूर्वी सांगितले होते की मुंबईला आम्हाला यायचे नाही. २६ ऑगस्टच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावनी करा हे आम्ही आधीच सांगितले आहे. उपाध्याय यांना माहिती नसेल की आम्ही सुद्धा गणेशभक्त आहोत. आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. आता फडणवीसांच्या जिव्हारी यायला लागले आहे. कारण मराठ्यांनी वेळ दिला. कायदेशीररित्या मराठे बसतात या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या आहेत. आता काय करायचे तर मग आता रडगाणं करायचे, अंगावर आले तर ढकलून द्यायचे. कारण मी मॅनेज होत नाही. मी फुटत नाही त्यामुळे ही कारणं आहेत.'
मोर्चा मुंबईत आल्यानंतर मोठी समस्या होईल यावर जरांगे म्हणाले की, 'काहीही वाहतूक कोंडी होणार नाही. हे मुद्दाम नाही. ४ महिने झाले तारीख जाहीर केलेली. आम्ही शांततेत येणार आहोत. गरिबाची लेकरं आहोत आणि आम्ही सुद्धा गणेशभक्त आहोत. आमची लोक मुंबईकडे निघाले पण. मराठे धडाधड निघालेत. उद्या सकाळी १० वाजता मी मुंबईला निघणार आहे. आता चर्चा नाही. चर्चा तिथे गेल्यावर. आजचा दिवस फक्त अंमलबजावनीसाठी. चर्चा खूप झाल्या आहेत. आता चर्चा झाली तर थेट मुंबईत आझाद मैदानावर.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.