मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खालावत असल्याने राज्यभरात मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये मराठा समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. सरकारने दोन दिवसात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडावे अन्यथा 23 सप्टेंबर रोजी संपूर्ण नांदेड जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा मराठा बांधवांनी दिलाय.
लोकसभेत भारतीय जनता पक्षाला उमेदवारी मिळाला नाही. आता आम्हाला पिंपरीत भाजपचाचं उमेदवार हवा अशी, आग्रही भूमिका भाजपच्या बैठकीत एकमुखाने मांडण्यात आलीय. भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात नाराजी दिसू लागलीय.
राठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने येऊन घोषणाबाजी करत आहेत. मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी केल्यानं ओबीसी आंदोलकदेखील घोषणाबाजी करत आहेत. अंतरवाली फाट्यावर वडीगोद्री येथे सध्या तणावाच वातावरण पाहायला मिळत आहे.पोलिसांकडून तगडा बंदोबस्त असतानाही मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने येत आहे. अंतरवाली सराटीच्या रस्त्यालाच लक्ष्मण हाके यांच आमरण उपोषण स्थळ असल्याने मराठा आंदोलक अंतरवाली सराटीत येत आहे त्यामुळं गोंधळ होत आहे.
आज दुपारी तीन वाजता या सगळ्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाल्या आहेत.
येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौरा करणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मिळणार ग्रीन सिग्नल मिळेल.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सह्याद्री अतिथगृह येथे मंत्री समितीची बैठक दुपारी 4 वाजता होणार आहे . यावर्षीचा साखर कारखाना गाळप हंगाम कधीपासून चालू करायचा ,या संदर्भात होणार मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय. प्रत्येक वर्षी ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत असते मात्र यावर्षी ही,बैठक सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत होऊन बैठकीतील निर्णय मुख्यमंत्री यांना कळवला जाणार.
कास पठारावर फुलांचा रंगोत्सव सुरू झाल्यानंतर पठारावर पर्यटकांची गर्दी आता वाढू लागली आहे.शनिवार,रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक या पठाराला भेट देण्यासाठी येत आहेत.पावसाने उघडीप दिल्याने कास पठारा कडे पर्यटकांची पावले आता वळू लागली आहेत.पठार विविध जातीच्या फुलांनी बहरल्याने सर्वत्र गुलाबी,जांभळ्या आणि पांढरा रंगाची उधळण झाल्याचे पहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसात हजारो पर्यटकांनी पठाराला भेट दिली असून देश विदेशातील पर्यटकांनी कास पठारावर फुले पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा. देवेंद्र फडणवीस, सी.आर... पाटील तुमच्या माध्यमातुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडुन विनंती करतो, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, अशी मोठी मागणी अभिनेते नाना पाटेकर यांनी केली. पुण्यामधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
- पुण्यामधील वडगाव शेरी, मतेनगर हिरामण हॉस्पिटलजवळ सुपर मार्केटला भीषण आग लागल्याची घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून 8 वाहने दाखल घटनास्थळी दाखल झाली आहेत. आग आटोक्यात आणली असून कोणतीही जखमी किंवा जिवितहानी झालेली नाही.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विशेष अधिवेशनाची मागणी वगळता इतर मागण्या मान्य करण्याबाबत बैठक लावू असे आश्वासन दिले त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण,हैद्राबाद गॅझेट तसेच सगेसोयरे जीआरला हरकती आल्याने याला विलंब लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
लातूरचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एडवोकेट तुकाराम माने मागच्या आठ दिवसापासून उपोषण करत आहेत. राज्यातील वडार वस्ती सुधारण्यासाठी आर्थिक मदतीची तरतूद करा, वडार समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वस्तीग्रह करा.. यासह इतर मागण्या घेऊन मागच्या आठ दिवसापासून उपोषण सुरू आहे. दरम्यान त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि वडार समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलकांनी महामार्ग अडवत आंदोलन सुरू आहे..
बीड जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना मराठा आंदोलकातील अंतर्गत गोंधळ समोर आला आहे. शरद पवार गटाच्या महिला नेत्या हेमा पिंपळे या शिष्टमंडळात सहभागी झाल्या होत्या. मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाची भूमिका जाहीर करताच ही शाब्दिक चकमक दिसून आली. त्यामुळे यावेळी मराठा समन्वयकांमध्येच बाचाबाची दिसून आली. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला.
शिवस्वराज्य यात्रेची जळगाव जिल्ह्यात आजपासून सुरुवात होत असून चाळीस गावात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. जळगाव जिल्ह्यांमध्ये या यात्रेचा आयोजन करण्यात आले असून चाळीसगाव येथे या शिवस्वराज्य यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील .खा अमोल कोल्हे यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती
सात वर्षाच्या मुलाला गावातून उचलत बिबट्याने ठार केले. भावेश झारकर असे या मुलाचे नाव असून, तो चंद्रपूर जवळच्या सिनाळा येथील आहे. सायंकाळच्या सुमारास तो खेळत असताना बिबट्याने त्याला उचलले. आज सकाळपासून वन पथकाने शोध घेतला असता त्याचे केवळ मुंडके सापडले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असतानाही शासनाने या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ व जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्हा बंद ठेवला आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला काही झाल तर एकाही सत्ताधारी व विरोधी नेत्यांना महाराष्ट्रात फिरुन देणार नाही असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि पाठिंबा दर्शवत, बीडच्या लिंबागणेश गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे..जरांगे पाटलांचे अंतरवली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाच पाचवा दिवस आहे. त्यामुळं त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र सरकार याची दखल घेत नाही, उलट सरकारकडुन वारंवार मराठा आरक्षण बाबतीत शब्द देऊनही चालढकल करण्यात येत आहे. यामुळे आता गाव खेड्यातही मराठा बांधव आक्रमक झाला असल्याचं पाहायला मिळत आहे
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला असुन सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती त्यामुळे अगदी सकाळपासून व्यापारी बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली आहेत त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत असुन जिल्ह्यातील बहुतांश शाळा महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आले आहेत.
सकल धनगर बांधवांनी सुरू केला रास्ता रोको..
पुणे - इंदूर महामार्ग धरला रोखून ...
मेंढ्या घेऊन मेंढपाळ रास्ता रोकोमध्ये सहभाग ...
एस.टी.प्रवर्गात सहभाग करण्याची आग्रही मागणी...
रास्ता रोको मुळे दुतर्फा वाहतूक ठप्प...
शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ...
स्वातंत्र्यवीर सावरकर भारतरत्नच्या पुढे गेलेले आहेत. मात्र सावरकरांना भारतरत्न द्यावा असं कार्यकर्त्यांची मागणी आहे. देऊ शकले तर पंतप्रधान मोदीच देऊ शकतात कारण बाकी समोरचे जे आहे ते माफी वीर म्हणून बोंबलत असतात अशी प्रतिक्रिया शरद पोंक्षे यांनी दिली आहे. पुण्यातील बालगंधर्व मध्ये त्यांचं आज मधुकर मुसळे यांनी व्याख्यान आयोजित केला आहे. आता जे काही आहेत परदेशात जाऊन भारताची बदनामी करत असतात सारखं माफी वीर माफी वीर म्हणून बोलत असतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असा टोला शरद पक्ष यांनी राहुल गांधी यांना लगावला.
बीडमध्ये आज मराठा बांधवांनी बंद पुकारला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात आणि पाठिंबा दर्शवत, मराठा समाज बांधवांनी आज बीड बंदची दिली आहे. सरकार मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी जरांगे पाटलांना सहाव्यांदा उपोषण करावा लागतेय. आज त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र तरी देखील सरकार उपोषणाची दखल घेत नाही. उलट आमचा आवाज दाबण्याचा पोलीस प्रशासनाने जवळपास 500 मराठा बांधवांना नोटीस दिल्या आहेत..त्यामुळं आमचं एकच सांगणं आहे, आज हा बंद शांततेत आहे, जर सरकारने याची दखल घेतली नाही, तर यापेक्षा तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटतील, महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करू, असा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे
नाशिकमद्ये महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा वाद चिघळण्याची चिन्हं आहेत. कारण, शरद पवार गटाने नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १० जागांवर दावा केला आहे. अजित पवार गटात गेलेल्या ६ विद्यमान आमदारांच्या ६ जागांसह ग्रामीण भागातील २ आणि शहरातील २ जागांसाठी शरद पवार गटआग्रही आहे.
निफाड, येवला, दिंडोरी, देवळाली, सिन्नर, कळवणसह चांदवड, मालेगाव मध्य आणि शहरातील नाशिक पश्चिम, नाशिक मध्य अथवा नाशिक पूर्व अशा १० जागांसाठी शरद पवार गटाने आग्रह धरला आहे. तर दुसरीकडे नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्यच्या जागेवर याआधीच उद्धव ठाकरे गटाने दावा करत प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.
सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करावं या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काल त्यांची प्रकृती खालवल्याने अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मोठ्या संख्येने दाखल होत आहे.
मनोज जरंगे पाटील यांची चौथ्या दिवशी प्रकृती खालवल्याने शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्यावर डॉक्टरांनी सलाईनद्वारे उपचार केले आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन दिवसापासून माध्यमांशी संवाद साधला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील माध्यमांशी काय संवाद साधतात आणि काय भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे...
कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात कैद्यांमध्ये आपापसात राडा झाला. हा राडा सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीव मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सहाय्यक फौजदार यशवंत पांडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली आहे. किरण अर्जुन आजवे आणि मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड अशी कारागृहात राडा करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी बीडमध्ये सुरु असलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सुभाष रोडवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.दुकानदार अन व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन, उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.. त्याचबरोबर बीड शहरातील इंग्लिश स्कूल देखील बंद करण्यात आल्या आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीकडे येत होते. यावेळी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू असलेल्या वडीगोद्री फाट्यावर पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणार रस्ता बंद केल्याने पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.
त्यानंतर मराठा आंदोलकाच्या गाड्या का सोडता असे म्हणत ओबीसी आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती. यामुळे मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्याने थोडावेळ वडीगोद्री फाट्यावर तणाव निर्माण झाला होता. दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केलाय.
ज्या पोलिसांनी मराठा आंदोलकांना अडवलं होतं त्यांच्या निलंबनाची मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. दरम्यान काल रात्री मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आलेल्या ठिकाणी आता शांतता असून पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.