मुंबई-गोवा महामार्गाचं ९५% काम पूर्ण झालं आहे.
पनवेल-इंदापूरच्या ८४ किमी रस्त्यामुळे प्रकल्पात मोठा विलंब.
मार्च २०२६ ही नवी अंतिम मुदत निश्चित.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खड्डे तातडीने भरले जाणार.
महामार्ग सुधारण्यासाठी झालेल्या टीकेनंतर महाराष्ट्र सरकारने १४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ४३४ किमी लांबीच्या मुंबई गोवा महामार्गाच्या पुर्णतेसाठी नवीन तारीख निश्चित केली आहे. या महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता हा महामार्ग ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.
राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) माहितीनुसार, महामार्गाचे सध्या ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, पनवेल ते इंदापूरदरम्यान, ८४ किमी लांबीच्या भागांत उड्डाणपूल, बायपास पुनर्बांधणी आणि कंत्राटदाराच्या विलंबामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. आता बांधकाम ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना त्यांच्या विभागाने अलिकडेच दिलेल्या सादरीकरणात सांगितले.
कोकण एक्स्प्रेस किंवा एनएच ६६ म्हणून ओळखला जाणारा हा महामार्ग पळस्पे (पनवेल) ते झाराप (महाराष्ट्र गोवा सीमा) असा असणार आहे. २०११ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे उद्दीष्ट २ लेन मुंबई गोवा महामार्गाला ४ लेन एक्स्प्रेसवेमध्ये बदलणे होते. यामुळे आतापर्यंतचा १२ तासांचा प्रवास केवळ सहा तासांवर आणण्याचे उद्दीष्ट आहे.
गेल्या दशकभरात महामार्गाच्या कामाचा दर्जा, खड्डेमय रस्ते आणि रस्त्यांवरील वळणांमुळे वाहनचालकांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागतो. नवीन महामार्गाचे बांधकाम १० पॅकेजसमध्ये विभागले आहे. पहिले दोन पॅकेजेस - पनवेल आणि इंदापूरदरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे हाती घेतले जात आहे. तर, उर्वरित ८ पॅकेजेस राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्याअतंर्गत आहेत.
पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी सांगितले की, वडखळ–महाड दरम्यानचे सहा उड्डाणपूल वर्षानुवर्षे रखडले आहेत. नव्या कंत्राटदारांना काम देण्यात आले असून, सप्टेंबर २०२५ आणि मार्च २०२६ या नवीन डेडलाईन्स निश्चित करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात रस्ते खड्डेमुक्त
मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांमुळे लवकर काम पूर्ण झालं नाही, असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. तसेच 'गणेशोत्सवाच्या काळात रस्ते खड्डेमुक्त राहतील याची काळजी घेण्यात येत आहे,' असंही ते म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले होते की, हा महामार्ग सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. मात्र भूसंपादन, निधीअभावी कंत्राटदारांच्या अडचणी यामुळे मुदत वाढवावी लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.