ग्रामीण महिलांसाठी सरकारची नवी योजना
२४ लाख रुपयांपर्यंत आर्थिक लाभ
कृषी अवजार बँक स्थापन करण्यास प्रोत्साहन
लाडकी बहीण योजनेनंतर सरकारनं आता ग्रामीण भागातील महिलांसाठी एक अनोखी योजना आणली आहे. या योजनेतून महिलांना मोठी आर्थिक लाभ होणार आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला चालना देताना महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारनं नवी योजना आणली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गावपातळीवर कृषी अवजार बँका स्थापन करण्यास प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
या योजनेतून शेतकऱ्यांना (Farmer)आधुनिक यंत्रसामग्री सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत. तसेच महिला बचत गटांसाठीही उत्पन्नाचे नवं साधन निर्माण होणार आहे. या योजनेंतर्गत पात्र महिला बचतगटांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान कमाल २४ लाख रुपयांपर्यंत मिळेल. ग्रामीण भागात शेतीसाठी मजुरांची कमतरता तीव्रतेने जाणवत असते.
परिणामी, शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढत आहे. लहान व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसते. ही समस्या लक्षात घेतल्यानंतर भाडेतत्त्वावर यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी (Agriculture) अवजार बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रे गरजेनुसार उपलब्ध होतील. पेरणी, लावणी आणि कापणीसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये ही यंत्रे उपयुक्त ठरणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिला बचत गटांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना बँक खात्याचे तपशील तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागेल. अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आलीय.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या गटांना ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाईन हार्वेस्टर, फवारणी पंप यांसारखी विविध आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करता येणार आहे. स्थानिक पीक पद्धतीनुसार आवश्यक यंत्रांची निवड करण्याची मुभाही देण्यात आली आहे.