बालाजी सुरवसे
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे जुन्या वादातून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भर रस्त्यावर गाठून वडील आणि मुलाने मिळून कोयत्याने वार करत जीवे ठार केले आहे. हत्येची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे घडलेल्या हत्याकांडमध्ये सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत सूर्यकांत सूरवसे आणि हल्लेखोर दोघेही नळदुर्ग येथील असून मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नळदुर्ग येथील शिवराज हॉटेल अँड बारसमोर हि धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान सुरवसे आणि हल्लेखोर यांच्यामध्ये जुना वाद असल्याचे सांगितले जात आहे.
कोयत्याने केले १७ वार
सदर घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यात संशयित आरोपी जयकुमार गायकवाड याला मृत सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे हा चाकू दाखवत असताना दिसत आहे. याच दरम्यान जयकुमार यांचा मुलगा सोहन गायकवाड याने धावत येऊन हत्या केल्याचे कैद झाले आहे. यामध्ये सोहन गायकवाड याने सुरवसे यांच्यावर कोयत्याने तब्बल १७ वार करत जीवे ठार मारले आहे.
हल्लेखोर मुलाला घेतले ताब्यात
दरम्यान सामाजिक कार्य का करतो? म्हणून आरोपींनी पती सूर्यकांत याचा खून केल्याची फिर्याद मृत सूर्यकांतच्या पत्नीने पोलिसात दिली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलगा सोहन गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर वडील जयकुमार गायकवाड मात्र फरार आहे. मृत सूर्यकांत सुरवसे यांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला असून आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.