पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी
नागपूर : डोंबिवलीतील अमुदान कंपनीतील स्फोटाच्या दुर्घटनेनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या स्फोटाच्या घटनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधकांनी धोकादायक कंपन्या हलवण्यात पुढाकार घेतला नसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला. विरोधकांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेत प्रत्युत्तर दिलं आहे.
डोंबिवलीतील अमुदान कंपनी स्फोट दुर्घटनेवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'कोणतेही उद्योग एका दिवसात हलवले जात नाहीत. उद्योग तिथून हलवले गेले पाहिजे. यासंदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात काही केले नाही'.
'उद्धव ठाकरेंची एक तरी फाईल दाखवा, ज्यात त्यांनी काही निर्णय केला आहे. मात्र घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व उद्योगांना पर्यायी जागा दिली पाहिजे. सरकार त्यासाठी पुढाकार घेईल, असे फडणवीसांनी सांगितले.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'या प्रकरणाचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. या प्रकरणी कारवाई पोलिसांनी केली पाहिजे, ती सर्व कारवाई पोलिसांनी केली आहे. तसेच बाल हक्क मंडळाने चुकीचा निर्णय दिला होता, त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन तो निर्णय बदलून घेतला आहे. पहिल्यांदा पबचे मालक आणि मुलाचे वडील यांना ही अटक झाली आहे. कठोर कारवाई झाली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण योग्य नाही'.
अभ्यासक्रमावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'मनाचे श्लोक महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्षी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात. त्यामुळे ते अभ्यासक्रमात आणले जात आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र विनाकारण संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.