भरत नागणे, साम टीव्ही
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. भाजपचे माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हयात गाठीभेटी घेत बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, नाही असं होत राहतं, पावसाळा आला की छत्र्या उगवतात. याबाबतीत अधिकचं बोलणं उचित नाही. शेवटी जिल्हा बँक ही सोलापूरकरांची बँक आहे. पालकमंत्री म्हणून मी सरकारचा प्रतिनिधी इथं काम करतो, त्यामुळे जिल्हा बँकेतलं मला अधिक काही समजत नाही.
पुढे बोलताना त्यांनी भाजप स्वबळावर जिल्हा बँक जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. "जिल्हा बँकेची निवडणूक कशी लढवायची हे ठरवणारी आमची मजबूत नेत्यांची फळी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. ते बसतील, ते निर्णय घेतील. पण मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाची ताकद ही स्वतःच्या हिमतीवर आहे आणि भाजपची सत्ता जिल्हा बँकेमध्ये येईल, यात कुठलीही शंका-कुशंका ठेवण्याचे कारण नाही. समविचारी लोक सोबत आले तर नक्की आम्ही त्यांना सोबत घेऊ," असे गोरे यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानली जाते. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये असले तरी त्यांनी स्वबळावर मोर्चेबांधणी सुरू केल्याने भाजपमधील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले होते. पालकमंत्री गोरेंच्या या 'छत्र्या' वक्तव्यामुळे मोहिते पाटील विरुद्ध गोरे हा वाद पुन्हा एकदा समोर आला असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप कोणत्या रणनीतीने उतरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.