धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने पुन्हा डोकं वर काढलं असून, कावळ्यांचा अचानक मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ढोकी परिसरात अनेक कावळे मृत अवस्थेत आढळले होते. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर त्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आता पुन्हा कळंब शहर, दहिफळ गाव आणि जिल्ह्यातील इतर भागांतही कावळ्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
आतापर्यंत 50 हून अधिक कावळे मृत आढळले असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा संसर्ग पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बर्ड फ्ल्यूने बाधित पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने कावळे मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडत असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी मृत पक्ष्यांना हात लावू नये, तसेच अशा घटना त्वरित प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे सुचवण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाने परिसर निर्जंतुकीकरणासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे. बर्ड फ्ल्यू हा संसर्गजन्य विषाणूजन्य आजार असल्याने याचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.