योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी
बीडमधील गेवराई शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. गेवराई शहरातील छत्रपती मल्टिस्टेट येथे एका शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. मल्टिस्टेटकडून खात्यातील पैसे मिळत नसल्याने हतबल झाल्याने शेतकऱ्याने कठोर पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर छत्रपती मल्टिस्टेटच्या संचालकावर कारवाई व्हावी अशी मागणी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती मल्टिस्टेटच्या दारात एका शेतकऱ्याने गळफास घेतला. अल्पभूधारक शेतकऱ्याने मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव व्हावी म्हणून गावाकडील शेती विकून आलेली रक्कम मल्टिस्टेटमध्ये ठेवली होती. आता पैशांची गरज भासल्याने त्याने मल्टिस्टेटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण पैसे न मिळाल्याने मानसिक त्रासाने शेतकऱ्याने आपले जीवन संपवले.
सुरेश आत्माराम जाधव असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी अकरा लाख रुपये छत्रपती मल्टिस्टेटमध्ये ठेवले होते. शाखेत सतत चकरा मारुनही पैसे मिळत नसल्याने हतबल झाल्याने जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली. मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी पैशांची गरज होती. त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळत नव्हते.
शाखाधिकारी ज्योती क्षीरसागर यांना 'माझ्या मुलांच्या शिक्षणाचं तुम्ही वाटोळं केलं, त्याबद्दल धन्यवाद. एखाद्याचा एवढा अंत पाहू नका असा निरोप छत्रपती मल्टिस्टेटचे संचालक संतोष भंडारी यांना द्या' असा भावनिक संदेश पाठवत सुरेश जाधव यांनी जीवन संपवले. छत्रपती मल्टिस्टेटच्या संचालकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुरेश जाधव यांच्या पत्नी आणि मुलीने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.