बीडमध्ये एका तरूणीनं लग्नाच्याच दिवशी छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. मामाच्या घरातच तिने गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला आहे. मात्र, आरोपीला अटक केल्यानंतर त्याला त्वरीत जामीन मिळाला. आता साक्षीच्या आईने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे.
लाडकी बहीण योजना सुरू केली पण..
साक्षीच्या आईने पत्रात म्हटलं की, "साहेब, तुम्ही 'लाडकी बहीण' म्हणत राज्यातील अनेक महिलांना आधार दिला. पण माझ्या लाडक्या लेकीला न्याय कोण देणार? माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र, एका क्षणात ती नाहीशी झाली. काही नराधमांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तुमच्या भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साक्षी आता या जगात परतणार नाही, हे आम्हाला देखील ठाऊक आहे. पण क्रुर नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे."
पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप
या पत्रात साक्षीच्या आईने पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. "स्वप्निल राठोड या पोलीस उपअधीक्षकांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. उलट आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली. आरोपींच्या मोबाईलमधील चॅट्स अजूनही उघड करण्यात आलेले नाहीत. आरोपीची बहीण देखील या प्रकरणात सहआरोपी आहे. मात्र, त्याची बहीण पोलीस दलात असल्यामुळे पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचा आम्हाला संशय आहे," असं साक्षीच्या आईने आपल्या पत्रात नमुद केलं आहे.
गुन्हेगारांना शिक्षा मिळावी, एवढीच मागणी
साक्षीच्या आत्महत्येमुळे कुटुंब हतबल झालं असून, गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी साक्षीच्या आईने केली आहे. "साहेब, आपण मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असता, तर हा गुंड आज जेलमध्ये असता. अजूनही आमचा विश्वास आहे की, आपणच आमच्या मुलीला न्याय मिळवून द्याल. एवढीच आमची विनंती आहे," अशा शब्दात साक्षीच्या आईने पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.