चाकणकर आणि तटकरे यांच्या बोटाच्या जखमेवरून वाद
अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्राशी संबंधाची चर्चा
जखमेबाबत स्पष्टीकरण दिले गेले
नाशिक जिल्ह्यात बस्तान बसवलेल्या भोंदूबाबाच्या लैंगिक अत्याचाराच्या कथा समोर येतायेत. त्यानं राजकारण्यांना, अधिका-यांनाही कसं वश केलं याची माहितीही एसआयटीच्या तपासात समोर येत आहे. भोंदू खरातला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असला तरी त्यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. त्यांच्या अनामिकेला झालेल्या जखमेचे फोटो सुषमा अंधारेंनी दाखवले होते आणि चाकणकरांनी बोट कापून काळी जादू' केल्याचा दावा केला होता. मात्र आता चाकणकरांच्या बचावासाठी त्यांचे कार्यकर्ते सरसावले आहेत.
चाकणकरांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही वादात सापडले आहेत. त्यांच्याही अनामिकेलाच जखम झाल्याचा फोटो समोर आला आहे. त्यावर तटकरेंनी स्वत:च स्पष्टीकरण देत गाडीच्या दरवाजात बोट चेपल्यामुळे जखम झाल्याचा दावा केलाय. तटकरे आणि चाकणकर दोघांच्याही अनामिकेची जखम ही गाडीचा दरवाजा लागल्याने झाली असली तरी तांत्रिक अघोरी पुजेत अनामिकेला महत्वाचं स्थान आहे. हे बोट कापण्यामागचे गूढ काय आहे ?पाहूया..
अनामिका म्हणजे अंगठ्यापासून चौथ्या क्रमांकाचे बोट. या बोटाची नस थेट हृदयाशी जोडलेली असते, असे मानले जाते. म्हणून लग्नाची अंगठीही याच बोटात घातली जाते. हे बोट सूर्याशी संबंधित आहे. या बोटाच्या मुळाशी 'सूर्याचा पर्वत' असतो. जो व्यक्तीच्या जीवनातील यश आणि मान-सन्मान दर्शवतो. अनामिकेवर चांगले चिन्ह (उदा. त्रिकोण, चौरस) हे यशाचे आणि उत्तम करिअरचे संकेत मानले जातात.
या बोटाचा वापर प्रामुख्याने मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी केला जातो. हृदय आणि मनाशी संबंध असल्याने तंत्र-मंत्रात अनामिकेला महत्व आहे. खरात अघोरी विद्या करायचा. तांत्रिक विधीतून यश, पैसा, प्रतिष्ठा मिळेल असा दावा करायचा. समस्या सुटतील याचं आमिष दाखवून बड्या लोकांना लुटायचा. पुरोगामी महाराष्ट्रातील नेत्यांची - प्रतिष्ठीतांची या भोंदूबाबाशी असलेली सलगी नक्कीच लाजीरवाणी आहे. एसआयटीच्या सखोल तपासात या सर्वामागचं गूढ उलगडणार का? याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.