अजित पवार यांचा अपघाती मृत्यू
महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला
संजय राऊत यांनी दुःख व्यक्त केलं आहे
अजित पवार यांच्याशिवाय राजकारण बेचव आणि अळणी
महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी दुःखद घटना समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा आज सकाळी अपघातात मृत्यू झाला आहे. विमानाच्या लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले, या दुर्घटनेत अजित पवारांसह ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कार्यक्षम प्रशासक आणि जमिनीवरचा नेता गमावला आहे. या दुर्घटनेने बारामतीसह राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी देखील या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. संजय राऊत यांनी दुःख व्यक्त करत म्हटलं आहे की, "अजित पवार यांच्याशिवाय राजकारण बेचव आणि अळणी आहे."
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. याप्रकरणी राज्यातील नेत्यांनी दुःख व्यक्त केले असून सर्वांनाच अश्रू अनावर झाले आहेत. खासदार संजय राऊत म्हणाले की, सामाजिक जीवनातील आजचा काळा दिवस आहे. आज सकाळी जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती कळली तेव्हा, आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणतीही बातमी कानावर पडू नये आणि अजितदादा पवार हे सहीसलामत अपघातातून बाहेर निघावेत. परंतु दुर्दैवाने धक्कादायक आणि दुःखदायक घटना कानावर आली.
अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण हे बेचव आणि अळणी आहे. त्यांचं व्यक्तिमत्व आपण गेले अनेक वर्षांपासून पाहत आलो आहोत. दिलखुलास, रोखठोक आणि कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची कामाची पद्धत, त्यांचं बोलणं, प्रशासनावरील पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहतील. बारामती आणि त्यांचं घट्ट नातं होतं आणि त्यांचं याचं बारामतीत निधन व्हावं हा एक विचित्र योगायोग आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.
अजितदादा पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना खासदार संजय राऊत भावूक झाले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आज संपूर्ण महाराष्ट्र खरोखरच मोठ्या दुःखात बुडाला आहे. अजितदादांना अशी श्रद्धांजली वाहावी लागेल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं.
उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा देताना राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते. उद्धवजी नेहमी म्हणायचे की, कॅबिनेटच्या बैठकीला पूर्ण तयारी करून येणारा आणि विषयाची सखोल जाण असणारा हा एकमेव मंत्री होता. आदरणीय शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आणले आणि घडवले. गेल्या दोन-अडीच वर्षांत त्यांनी शरद पवारांशिवाय स्वतःच्या राजकारणाची वेगळी वाट निवडली होती; परंतु त्यांच्या राजकीय प्रवासाचा असा चटका लावणारा अंत होईल, असे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.