आपल्या दगदगीच्या, स्पर्धात्मक आणि सतत काहीतरी मागत राहण्याच्या जीवनशैलीत माणसाला स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची फारशी संधी मिळत नाही. आपल्या वेदना दाखवणं, रडणं किंवा असुरक्षित वाटणं हे अनेकदा लाजिरवाणं मानलं जातं. पण भारतातील महानगरांमध्ये एक वेगळीच मोहीम सुरू झाली आहे. ‘क्रायिंग क्लब्स’ म्हणजेच रडण्यासाठी विशेष जागा उघडली जातेय.
जपानमधील ‘रुइकात्सू’ या प्रथेतून प्रेरणा घेऊन हे क्लब्स आता भारतात लोकप्रिय होताना दिसतायत. मुंबईमध्ये देखील हे सुरु झालं आहे. तर दिल्ली आणि बेंगळुरूत आधीच असे क्लब्स सुरू झाले आहेत. सुरतमध्ये २०१७ पासून ‘हेल्दी क्रायिंग क्लब’ नावाचा उपक्रम दर महिन्याला एकदा लोकांना एकत्र आणतो. अगदी हैदराबादसारख्या शहरातसुद्धा अशा प्रकारचे ‘वल्नरेबिलिटी सर्कल्स’ लोकांना भेटण्याची, आपले भाव मोकळे करण्याची आणि आसवं ढाळण्याची संधी देत आहेत.
मुंबईतील खार भागातील नव्या ‘क्राय क्लब’मध्ये सहभागींसाठी एक सुरक्षित आणि कोणताही निर्णय न देणारं वातावरण तयार केलं जातं. सौम्य संगीत, गरमागरम चहा आणि शांत वातावरणात लोक एकत्र येतात. रुमाल आणि टिश्यूज असतातच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिथे असतात समजून घेणारे, पाठिंबा देणारे अनोळखी लोक असतात.
याठिकाणी तुम्हाला तुमच्या भावना समजावून सांगायची किंवा त्यांचं कारण द्यायची जबरदस्ती नसते. फक्त मनातलं व्यक्त करायचं मग ते रडून असो, मन मोकळं करून बोलून असो किंवा अगदी एखाद्याला मिठी मारून असो. लोक इथून निघताना थोडं हलकं झालेलं जाणवतात.
‘रुइकात्सू’ हा जपानी शब्द दोन शब्दांतून बनला आहे. ‘रुइ’ म्हणजे अश्रू आणि ‘कात्सू’ म्हणजे क्रियाकलाप. जपानमध्ये आधीच अशा प्रकारच्या जीवनशैलीला नावं दिली जातात, जसं की ‘शुकात्सू’ (नोकरी शोधणं) किंवा ‘कोंकात्सू’ (लग्नाची तयारी).
२०१३ मध्ये जपानी उद्योजक हिरोकी तेराई यांनी हे संकल्पनात्मक पातळीवर आणलं. त्यांनी पाहिलं की, लोक रडल्यानंतर अधिक हलकं, शांत आणि आनंदी वाटतात. त्यातून त्यांनी खास सेशन्स सुरू केले जिथे लोक एकत्र येऊन भावनिक चित्रपट बघतात, हृदयस्पर्शी गोष्टी ऐकतात किंवा अशा पत्रांचं वाचन करतात जे त्यांना रडायला लावतील. काही ठिकाणी ‘टिअर थेरपिस्ट्स’ म्हणजेच मार्गदर्शक असतात जे लोकांना साठून राहिलेल्या भावना व्यक्त करण्यात मदत करतात.
शास्त्राने हे सिद्ध केलं आहे की, भावनिक अश्रूंमध्ये ताण निर्माण करणारे हार्मोन्स असतात आणि रडताना ते शरीरातून बाहेर पडतात. त्यामुळे रडणं हे दुर्बलतेचं नव्हे तर प्रामाणिकपणाचं लक्षण मानलं जातं. अश्रूंमधून आपण आपल्या आयुष्यातल्या खोल सत्यांपर्यंत पोहोचतो. दडपलेलं दुःख, अपयशांची वेदना किंवा अपूर्ण राहिलेलं प्रेम. म्हणूनच रडणं ही एक प्रकारची नैसर्गिक थेरपी ठरू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.