फळं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वं, मिनरल्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते पचन व्यवस्थित राहतं आणि अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ रोजच्या आहारात सिझन आणि ताजी फळं खाण्याचा सल्ला देतात.
मात्र फळं आरोग्यासाठी चांगली असली तरी त्यामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज असते. त्यामुळे फळं खाताना योग्य प्रमाण आणि योग्य वेळ याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. विशेषतः डायबिटीज, प्रीडायबिटीज किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या व्यक्तींनी कोणती फळं खावीत आणि किती प्रमाणात खावीत, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
बेंगळुरूमधील एस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डायटेटिक्स विभागाच्या प्रमुख आहारतज्ज्ञ वीणा व्ही. सांगतात की, कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो आणि हेच फळांबाबतही लागू होतं.
एका वेळी खूप जास्त प्रमाणात फळं खाल्ल्यास त्यातील नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. पण याचा अर्थ फळं आरोग्यासाठी वाईट आहेत असं नाही. योग्य प्रमाणात आणि संपूर्ण फळाच्या स्वरूपात खाल्ल्यास ती बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर असतात. त्यामुळे फळांचं प्रमाण नियंत्रित ठेवणं महत्त्वाचं आहे.
आहारतज्ज्ञ वीणा व्ही. यांच्या मते, फळांमध्ये केवळ नैसर्गिक साखर नसते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात. हे सर्व पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास, पचन सुधारण्यास आणि अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. नियमित आणि संतुलित प्रमाणात फळं खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य, त्वचा आणि एकूणच शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे फक्त साखर आहे म्हणून फळं आहारातून पूर्णपणे काढून टाकणं योग्य नाही.
आहारतज्ज्ञ वीणा व्ही. सांगतात की, पूर्ण फळ खाणं आणि त्याचा ज्यूस पिणं यात मोठा फरक आहे. पूर्ण फळांमधील फायबर शरीरात साखर हळूहळू शोषली जाईल यासाठी मदत करतं. त्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढत नाही. पण फळांचा रस काढताना त्यातील बराचसा फायबर कमी होतो. त्यामुळे शरीरात साखर वेगाने शोषली जाते आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.
डायबिटीज किंवा प्रीडायबिटीज असलेल्या व्यक्तींनी फळं पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. ते योग्य प्रमाणात संपूर्ण फळं खाऊ शकतात. नुसती फळं खाण्यापेक्षा प्रोटीन किंवा हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांसोबत खाल्ल्यास अधिक फायदा होऊ शकतो. जसं की, फळांसोबत मूठभर सुका मेवा किंवा साखर न घातलेलं दही खाल्ल्यास रक्तातील साखरेतील अचानक होणारे चढ-उतार कमी होण्यास मदत होऊ शकते.
हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगने २०२५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, डायबिटीजच्या रुग्णांनी फळं खाणं टाळण्याची गरज नाही. उलट फळांमधील फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात.
मात्र योग्य फळं आणि योग्य प्रमाण निवडणं महत्त्वाचं आहे. कमी नैसर्गिक साखर आणि जास्त फायबर असलेली फळं अधिक चांगली मानली जातात. यामध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरीसारख्या बेरीज, कीवी, संत्रं आणि मोसंबी यांचा समावेश होतो.
अमेरिकन डायबिटीज असोसिएशनदेखील बेरीज आणि लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देते. कारण या फळांमधील फायबरमुळे साखरेचं शोषण हळूहळू होतं आणि रक्तातील साखर अचानक वाढत नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात ताजी फळं खाणं फायदेशीर ठरतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.