१४ एप्रिल हा दिवस खूप खास मानला जातो. कारण या दिवशी थोर नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच या दिवशी सोसायटीमध्ये सगळी मंडळी एकत्र येऊन जयंती साजरी करतात. यावेळेस तुम्हाला जर सगळ्यांसमोर प्रभावी, सकारात्मक आणि शिक्षणाचे महत्व पटवून देणारे भाषण द्यायचे असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा.
भाषणाची सुरुवात
विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे त्रिवार अभिवादन!
आज १४ एप्रिल हा भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. आज आपण अशा महान व्यक्तिमत्त्वाची जयंती साजरी करत आहोत, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. ज्यांनी अन्याय, अत्याचार आणि भेदभाव यांच्याविरुद्ध उभं राहून संपूर्ण देशाला समानतेचा मार्ग दाखवला ते म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे संपूर्ण भाषण
मित्रांनो,
१४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांनी जातीय भेदभाव आणि अपमान सहन केला. पण या अडचणींनी त्यांना थांबवलं नाही, उलट त्यांची जिद्द जास्तच वाढवली. शिक्षण हेच त्यांचं खरं शस्त्र होतं. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांमधून उच्च शिक्षण घेतलं. त्यांच्या नावावर ३२ हून अधिक पदव्या आहेत. जे त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. त्यांनी तयार केलेलं संविधान हे समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित आहे. त्यांनी प्रत्येक भारतीयाला ''एक माणूस, एक मत, एक हक्क'' हा मूलभूत अधिकार दिला. ते फक्त संविधान निर्माता नव्हते, तर ते एक महान सामाजिक सुधारक होते. त्यांनी अस्पृश्यता आणि जातीय भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. दलित, गरीब आणि वंचित समाजासाठी त्यांनी शिक्षण, रोजगार आणि सन्मानासाठी अनेक चळवळी उभारल्या.
महिलांच्या हक्कांसाठीही त्यांनी मोठं योगदान दिलं. महिलांना वारसा हक्क, शिक्षण आणि स्वातंत्र्य मिळावं यासाठी त्यांनी कायदे तयार केले. राजकारणातही त्यांनी मोठं योगदान दिलं. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते आणि त्यांनी देशाच्या कायद्यांची मजबूत पायाभरणी केली.
१९५६ साली नागपूर येथे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि समाजाला नव्या दिशेने नेलं. हा ऐतिहासिक क्षण लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारा ठरला.
''Annihilation of Caste''सारख्या त्यांच्या ग्रंथांमधून त्यांनी समाजातील अन्यायकारक व्यवस्था उघडपणे मांडली आणि लोकांना जागृत केलं.
मित्रांनो,
डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला एक अमूल्य संदेश दिला आहे
''शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!''
आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण फक्त त्यांना अभिवादन करून थांबायचं नाही, तर त्यांच्या विचारांचा स्वीकार करून समाजात समानता आणि शिक्षणाचा प्रसार करायचा आहे. चला तर मग, बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपणही एक प्रगत आणि सशक्त भारत घडवूया.
जय भीम!
धन्यवाद!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.