Sairat 2: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'सैराट'च्या दुसऱ्या भागाची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत मराठी सिनेसृष्टीला नवी ओळख मिळवून दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांकडून 'सैराट २'ची मागणी होत आहे. आता या चर्चेवर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे.
नागराज मंजुळे सध्या त्यांच्या आगामी 'फ्रेम' या प्रोजेक्टच्या निमित्ताने चर्चेत आहेत. याच दरम्यान स्क्रिनला दिलेल्या मुलाखतीत त्यांना 'धडक २'नंतर 'सैराट २' येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, 'धडकचा सिक्वेल आला म्हणून सैराटचाही सिक्वेल यायलाच हवा, असं नाही.'
नागराज पुढे म्हणाले की, "जर चांगली आणि सांगण्यासारखी नवी कथा मिळाली, तरच 'सैराट २' बनवला जाईल. केवळ प्रेक्षकांच्या अपेक्षा किंवा चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे सिक्वेल बनवण्यावर माझा विश्वास नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चांना नवं वळण मिळालं आहे.
यावेळी त्यांनी 'सैराट'च्या शेवटाबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, पहिल्या भागात कथेचा शेवट पूर्णपणे झाला होता. मात्र एखादा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला की, त्या चित्रपटातील पात्रांचं पुढे काय झालं असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहते. म्हणूनच आजही अनेक चाहते 'सैराट २' तसेच 'फँड्री'च्या सिक्वेलबाबत विचारणा करत असतात.
दरम्यान, २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सैराट'ने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकप्रियता मिळवली होती. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांच्या अभिनयासह अजय-अतुल यांच्या संगीतानेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. चित्रपटाच्या यशानंतर अनेक भाषांमध्ये त्याचे रिमेकही तयार झाले. सध्या 'सैराट २ची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी योग्य आणि दमदार कथा मिळाल्यासच सिक्वेलची निर्मिती होईल, असे स्पष्ट संकेत नागराज मंजुळे यांनी दिले आहेत.