Riteish Deshmukh: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुख:द निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच्या त्यांच्या जाण्याने दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘बिग बॉस मराठी ६’ च्या मंचावरही अभिनेता आणि होस्ट रितेश देशमुख यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे एक विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. रितेश देशमुख यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीमध्ये हजर राहून दादांना शेवटची श्रद्धांजली दिली. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’ च्या आगामी भागाच्या आगमनापूर्वी त्यांनी शोच्या मंचावर थेट प्रेक्षकांसमोर दादांसाठीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
रितेशने आपल्या भावनात्मक भाषणात म्हणाला की, 'नमस्कार! २८ जानेवारीचा सूर्य ‘सकाळ’ घेऊन येण्याऐवजी ‘काळरात्र’ घेऊन आला. एक दु:खद बातमी आली त्या बातमीने जो धक्का दिला, त्यातून मीच काय अजूनही अख्खा महाराष्ट्र सावरलेला नाहीये. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवारजी यांचं अपघाती निधन झालं. ही घटना फार वेदना देणारी आहे. कारण, ते फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नव्हते तर, आपले लाडके 'दादा' होते. आपण सगळेजण त्यांना प्रेमाने, आदराने अजित दादा म्हणायचो. आज हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला दादांना काहीतरी सांगायचंय
प्रिय दादा, आज इथे उभं राहून तुमच्याबद्दल असं बोलावं लागेल…हे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. खरंतर, तुमच्या शब्दाने, शैलीने, नजरेच्या धाकाने समोरच्याला नि:शब्द करण्याची ताकद तुमच्यात होती, तुमच्या शब्दातच ताकद होती. पण, तुमच्या जाण्याने आज महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. दादा, तुमचं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, माया आणि सामाजिक जाण यांचा त्रिवेणी संगम आहे. तुमचं रागावणं सुद्धा समोरच्याला कौतुकाची थाप वाटायची. अनेक वर्षे रखडलेली कामं तुमच्या एका आदेशावर पटकन मार्गी लागायची आणि म्हणूनच तुम्ही सामान्य माणसाच्या आयुष्यातील कामाचा माणूस होतात. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं तुम्ही सोनं केलंत.
तुमचा दिलखुलास अंदाज, मिश्किल स्वभाव प्रत्येकाला आठवत राहील. आपल्याच कार्यकर्त्याला 'लव्ह यू' म्हणताना 'अरे मला काय लव्ह यू म्हणतोयस, बायकोला म्हण' म्हणजे आधी कुटुंबाकडे बघ, गावाकडे लक्ष दे! हे सांगणारा माणूस आता राहिला नाहीये दादा तुमची जागा कधीच कुणी घेऊ शकणार नाही हे अगदी खरंय! कारण, तुमच्यासारखी राजकारणाची जाण आणि माणुसकीचं भान असलेला नेता आता शोधून सापडणार नाही.
आपल्या महाराष्ट्रासाठी झटणारी अनेक बापमाणसं वेळेआधीच सर्वांना पोरकं करून गेली. माननीय विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आर आर पाटील साहेब, प्रमोद महाजन साहेब आणि आता तुम्ही, तुम्ही सगळ्यांनी एकच धर्म पाळला. तो म्हणजे महाराष्ट्र धर्म. म्हणूनच, आज महाराष्ट्रातील प्रत्येकाचे डोळे पाणावलेत. दादा तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आमच्याकडे पाहत नक्की म्हणत असाल अरे रडताय काय? कामाला लागा. दादा तुम्ही कालही प्रेरणा होतात आणि आजही आमची प्रेरणा आहात, उद्याही प्रेरणा असाल. हीच प्रेरणा घेऊन मी सुद्धा काम सुरू करतोय आणि आपला हा शो सुरू करतो. तुमचाच रितेश विलासराव देशमुख!”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.