Ritesh Deshmukh: हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने रितेश आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांनी भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठाला भेट देत दर्शन घेतले आणि महाआरतीत सहभाग घेतला. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर रितेश देशमुखने प्रतिक्रिया देत त्यांना फटकारलं आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना रितेश देशमुख यांनी मंदिराबद्दल भावना व्यक्त करत सांगितले की, “या ठिकाणाची महती ऐकली होती. येथे येऊन महाराजांचा इतिहास जिवंत स्वरूपात पाहायला मिळाला. हे शक्तीपीठ सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. महाराजांच्या श्रद्धेपोटी प्रेमापोटी एवढे भव्य मंदिर उभारले या बद्दल शिवक्रांती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंद करीत, या शक्तीपीठ ठिकाणी मी आज आलो भविष्यात येत राहणार ” त्यांनी मंदिर उभारणाऱ्या संस्थेचंही कौतुक केलं.
यावेळी आमदार संजय गायकवाड व धीरेंद्र महाराज बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत विचारले असता रितेश देशमुख म्हणाला, “मी ते पूर्ण ऐकलेले नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करू शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही आक्षेपार्ह बोललं तर ते सहन केलं जाणार नाही.” त्याच्या या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
तसेच यानंतर त्याने सोशल मिडियावर धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली यामध्ये त्याने लिहीले, कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे.. प्रौढप्रतापपुरंदर...क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री काय म्हणाले?
अलीकडे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी दावा केला होता की, महाराज युद्धांमुळे थकले होते आणि त्यांनी सत्ता सोडण्याचा विचार करत समर्थ रामदास स्वामींकडे मुकूट सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच रामदास स्वामींनी पुन्हा ती जबाबदारी महाराजांवरच सोपवली, असेही त्यांनी सांगितले.
राजा शिवाजी चित्रपट
दरम्यान, ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. चित्रपटात जिनिलीया देशमुख, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, विद्या बालन, अभिषेक बच्चन, फरदीन खान आणि संजय दत्त यांसारखे मराठी आणि बॉलिवूड कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.