लाडकी बहीण योजना अपात्र महिलांना पुन्हा लाभ मिळणार
ई-केवायसीनंतर लाडकी बहीण योजनेत पुन्हा पात्र ठरणार
लाडकी बहीण योजना १५०० रुपये पुन्हा मिळवण्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागणार
आदिती तटकरेंनी दिली लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट
महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलले. ऑक्टोबर महिन्यापासून ई-केवायसी प्रक्रियेअंतर्गत सरकारकडून या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात होती. जानेवारी महिन्यापासून या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. ३१ एप्रिल ही ई-केवायसीसाठीची अंतिम तारीख होती.
आता ई-केवायसीची प्रक्रिया थांबली असून सरकारने आतापर्यंत केलेल्या पडताळणीमध्ये जवळपास ७० लाख महिला या विविध कारणांमुळे अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या लाभार्थी महिलांचा लाभ सरकारकडून बंद करण्यात आला. पण आता काही अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिला या पात्र ठरणार आहे. त्यांना पुन्हा सरकार १५०० रुपये हप्ता देण्यास सुरुवात करणार आहे. याबाबत सरकारने महत्वाची माहिती दिली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी साम टीव्हीशी बोलताना महत्वाची माहिती सांगितली. काही अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना पुन्हा लाभ दिला जाणार आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले की, 'अपात्र ठरलेल्या काही महिलांचे लाभ बंद करण्यात आले होते. पण त्यानंतर काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्या महिलांच्या नावावर वाहन नसतानाही आरटीओच्या डेटामध्ये नाव आले असेल त्यांनी आवश्यक पुरावे सादर केल्यानंतर पडताळणी करून लाभ पुन्हा देण्यात येणार आहे.'
त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत आणि त्यांच्याकडे पुरावे आहेत. अशा महिलांना पुरावे सरकारकडे सादर करून आपला लाभ पुन्हा मिळवता येणार आहे. अपात्र ठरलेल्या काही लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची संख्या कमी झाली आहे. ही योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती तेव्हा लाभार्थी महिलांचा आकडा अडीच कोटींच्या आसपास होता. आता ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाभार्थी महिलांचा आकडा १ कोटी ७७ लाख इतका झाला आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, 'पात्र लाभार्थी कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. काही पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडूनही पैशांची वसुली केली जाणार आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.