Eknath Shinde on Ladki Bahin scheme payments : राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे ३ हजार रूपये एकत्र आले. पण अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. ७० लाख अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले. पण काही महिला पात्र (Ladki Bahin Yojana Latest News) असतानाही खात्यत पैसे जमा झालेच नाहीत. त्यामुळे पुन्हा ईकेवायसी करता येणार का? पात्र असतानाही पैसे का मिळाले नाहीत? असा सवाल राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या मनात होता. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ई केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदेंनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील महिलांना ईकेवायसी करण्याची संधी मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. अंधेरी येथील लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिलाय.
आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अंधेरीतील शेर-ए-पंजाब नगर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा आणि पक्ष मेळाव्याला उपस्थित राहून स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, लाडक्या बहिणींच्या सन्मान सोहळ्यासाठी आज मला इथे आमंत्रित केले याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. आम्ही गरिबी पहिली आहे. आमच्या आई आणि पत्नीने केलेली काटकसर पाहिली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला. कुणी मायचा लाल आला तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असे यावेळी पुन्हा एकदा जाहीर केले.
लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे २३२ आमदार निवडून देत एक इतिहास घडवलेला आहे. महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेचा कौल मिळाला, तो या लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाला. आज आपण खऱ्या अर्थाने महिलाना सक्षम करतोय त्यांच्यासाठी योजना तयार करतोय. त्यांना आत्मनिर्भर बनवतो आहे. त्यांना एसटी मध्ये ५० टक्के सवलत आपण दिली. मुलींचे उच्च शिक्षण आपण मोफत केले, आपल्या नावासमोर आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिलाना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत असेही ते म्हणाले.
आपण स्थगिती नव्हे तर प्रगती सरकार आहोत, आज महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर वन आहे, परदेशी गुंतवणुकीत नंबर वन आहे. स्टार्ट अप मध्ये नंबर वन आहे. आज जगाला युद्धाची चाहूल लागली आहे. इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. मात्र अशा परिस्थितीतही देश भक्कमपणे उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन केले त्याची आपण अंमलबजावणी करतो आहे. पुढचे येणारे संकट लक्षात घेऊन जेवढी शक्य तेवढी इंधन कपात करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत नियमावली तयार केली आहे. हे सारे राष्ट्रहितासाठी आपण करत आहोत, काही लोक याची टिंगल करतात पण देश जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे रहायला पाहिजे असे यावेळी शिंदे यांनी नमूद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.