PM Modi Security Breach
PM Modi Security Breach Saam TV
ब्लॉग

PM Modi Security Breach: चूक, निष्काळजीपणा की षडयंत्र...

साम टिव्ही

(अजय बुवा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या आणि दहशतवाद्यांचा खातमा झाल्याच्या बातम्या नियमित अंतराळाने झळकायच्या. अलिकडच्या काळात महाराष्ट्रात (Maharashtra) भाजपची सत्ता असताना पोलिसांनी पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi)हत्येचा प्रयत्न असल्याचे "शहरी नक्षलवाद्यांचे षडयंत्र" शोधण्यात आले होते. या घटनांच्या तुलनेत पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेचा झालेला खेळखंडोबा हा निश्चितच गंभीर आहे. यामागे चूक होती, निष्काळजीपणा होता की खरोखर षडयंत्र होते, याचे उत्तर समोर यायलाच हवे. (PM Narendra Modi Security Breach in Punjab)

हुसैनीवाला येथील शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा वाहन ताफा रस्त्याने गेला आणि यादरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या (Prime Minister Security) सर्व नियमांची ऐशीतैशी झाली. देशातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीचा वाहनताफा काही आंदोलकांमळे उड्डाणपुलावर अडवला जातो. शेजारून वाहतुकीची वर्दळ सुरूच राहते. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी (Chief Minister), पोलिस प्रशासनाशी संपर्क होत नाही म्हणून हतबल अवस्थेत पंतप्रधानांचा ताफा १५ ते २० मिनिटे तसाच अडकून पडतो. हा संपूर्ण घटनाक्रम जेवढा नाट्यमय आहे, तेवढाच सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

हतबल, असहाय्य आणि असुरक्षित अवस्थेत उड्डाणपुलावर अडकून पडलेले भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा की मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचलो" यासारखे भेदरलेपणाचे विधान पंतप्रधानांनी केल्याचे सुरक्षा दलाच्या सुत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध होते. त्यावर पंतप्रधान कार्यालयाचे आणि सत्ताधारी भाजपचे मौन धक्कादायक आहे. इंग्रजीत म्हण आहे की, लिडर शुडबी आॅलवेज लीड फ्राॅम फ्रंट. अग्रभागी राहूनच नेतृत्व करणाराच खरा नेता असतो. यासाठी यापूर्वीच्या पंतप्रधानांची उदाहरणे उल्लेखनीय आहेत.

आणीबाणीच्या काळात जेएनयूमध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काळे झेंडे दाखवले होते आणि इंदिरा गांधींनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. इंदिरा गांधींना निवेदन वाचून दाखविताना आताचे माकप नेते सीताराम येचुरी यांचा फोटो गाजला होता. तर असाच प्रकार डाॅ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना घडला होता. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाहनाला घेराव घातला होता. डाॅ. सिंग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्याआधीचे उदाहरण म्हणजे १९७७ मध्ये तत्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाई पुण्यात टिळक स्मारक मंदिरात कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर चप्पलफेक केली होती. या घटनेला फारसे महत्त्व न देता मोरारजी देसाईंनी आपला कार्यक्रम पूर्ण केला होता.

त्यातुलनेत, छपन्न इंची छातीचा दाखला देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबमध्ये त्यांचा रस्ता अडविणाऱ्या आंदोलकांना पाठ दाखविली हा संदेश मात्र यातून गेला आहे. पाकिस्तानसाख्या कुरापतखोर देशाशी सीमा लागून असलेल्या दोन दशकांच्या दहशतवादाचा इतिहास असलेल्या आणि पंजाबसारख्या राज्यामध्ये पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्थेला खिंडार कसे पडते, एसपीजी पंतप्रधानांची सुरक्षा हाताळत असताना, त्यांना रस्त्याने नेण्याचा निर्णय कोणाचा होता, सारे काही सुरळीत असल्याचे गृहीत धरून पंतप्रधानांना अशा मार्गाने नेणे, जेथे त्यांना धोका उद्भवू शकतो, हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही काय, पंतप्रधानांच्या वाहन ताफ्याजवळ जमाव कसा पोहोचला, या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी आणि जबाबदार लोकांवर कारवाई देखील व्हायलाच हवी.

मात्र या घटनाक्रमावरून सुरू झालेले राजकीय आरोप प्रत्यारोप हे राजकारणाचा स्तर घसरल्याचे दर्शविणारे आहे. काॅंग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये मोदींचा सुरक्षेला धोका उद्भवणे, हा त्यांच्या हत्येचा प्रयत्न असून यामागे काॅंग्रेसचे "खुनी इरादे" असल्याचा आरोप भाजपकडून होणे. तर, काही अनुचित घडले नाही ना, यासारखी काॅंग्रेसची उथळ टिप्पणी पाहता, दोन्ही पक्ष या घटनेकडे किती गांभीर्याने पाहतात हे दिसते.

पंतप्रधानांचा जीव धोक्यात, हा भावनिक प्रचाराचा मुद्दा विधानसभा निवडणुकांमध्ये विशेषतः उत्तर प्रदेशात बनविण्याची भाजपची खेळी स्पष्टपणे दिसते आहे. पंतप्रधानांची सुरक्षेवरून सहानुभूती मिळविण्याचा, या सहानुभूतीचे मतांमध्ये रुपांतर व्हावे यासाठीचा भाजपचा प्रयत्न उघडउघड दिसतो. परंतु, शेतकरी आंदोलनानंतर झुकावे लागल्याने आणि प्रतिष्ठा मुद्दा केलेले कृषी कायदे मागे घेतल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या कणखर नेतृत्वाच्या प्रतिमेला गेलेला तडा याची सल भाजपमध्ये जाणवते.

त्यातच राज्यपालासारख्या घटनात्मक पदावर असलेल्या सत्यपाल मलिक यांनी वादग्रस्त बोलून पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला सुरूंग लावण्याची कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. पंतप्रधान मोदीची शेतकऱ्यांबद्दलची भावना चांगली नव्हती आणि गृहमंत्री अमित शाह मोदींबद्दल वावगे बोलल्याची सत्यपाल मलिक यांची विधाने प्रसिद्ध झाल्याने भाजपची चांगलीच गोची झाली. अखेर सत्यपाल मलिक यांनी खुलासा केला, पंतप्रधान मोदींबद्दल आदर व्यक्त केला आणि अमित शाह काहीही बोलले नसल्याची सारवासारव केली.

मात्र, त्यांच्या शब्दबाणांनी व्हायचे ते नुकसान करून टाकले. त्या धक्यातून सावरण्यासाठी आणि आक्रमकपणे समर्थकांपढे जाण्यासाठी भाजपला जो मुद्दा हवा होता तो मोदींच्या सुरक्षेबाबत पंजाबमधील घडलेल्या घटनेने मिळवून दिला आहे. दुसरीकडे, नवज्योतसिंग सिद्धुंच्या उपद्व्यापांनी ग्रस्त काॅंग्रेसला यामुळे पंजाबमध्ये नवा मुद्दा मिळाल्याने हायसे वाटले आहे. भाजपचे आरोप पंजाबचा अपमान करणारे असल्याचे काॅंग्रेसने बोलणे सुरू केले आहे. पण पंतप्रधानांसारख्या घटनात्मक संस्थेच्या सुरक्षेबद्दल संवगपणा नको, हे भान सत्तेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि सुरक्षेतील चुकीमुळे दोन महत्त्वाचे नेते गमावलेल्या काॅंग्रेसकडून राखले गेलेले नाही.

सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींची एसपीजी सुरक्षा हटविल्यानंतर थयथयाट करणारे, २०१९ मध्ये राहुल गांधींच्या रोड शो दरम्यान त्यांच्यावर चमकलेल्या मोबाईल टाॅर्चच्या प्रकाशाला लेजर गनचा प्रकाश म्हणून सुरक्षेबद्दल सरकारला आरोप करणाऱ्या काॅंग्रेस पक्षाचे नेते पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दल उथळपणे बोलतात आणि उठसूट उदारमतवादाचा दाखला देणारे काॅंग्रेसचे नेतृत्व त्यांना दटावत नाही किंवा पंतप्रधानांची विचारपूस करण्याचे, किमानपक्षी यावर चिंता व्यक्त करणारे ट्विट करण्याचे सौजन्य दाखवत नाही असे दिसते. तेव्हा कटुता टोकाला पोहोचली आहे हे वेगळे सांगायला नको.

मुठभर निदर्शकांमुळे पंतप्रधानांना अडकून पडावे लागल्यानंतर गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडून अक्षम्य चूक घडल्याचा ठपका ठेवला. पाठोपाठ पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी यावर पत्रकार परिषद घेऊन राजकीय उत्तर दिले.या प्रकाराच्या चौकशीसाठी पंजाब सरकारने आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने स्वतंत्र समित्याही नेमल्या. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचाही हस्तक्षेप झाला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गोंधळाबाबतच्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारच्या समित्यांना पुढील आदेशापर्यंत चौकशी थांबविण्यास सांगितले आहे.

तसेच पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याचे सर्व तपशील, नोंदी सुरक्षित ठेवण्याचे आदेशही केंद्राच्या तसेच राज्याच्या सुरक्षा यंत्रणांना दिले आहे. मात्र, चौकशी झाल्यानंतर हे प्रकरण शांत होईल ही शक्यता धुसर आहे. पंतप्रधानांचा जीव धोक्यात येतो, ही घटना दोन दिवसानंतर विसरून जाण्यासारखी नाही. त्यावर इतरांना उदाहरण ठरेल अशी कारवाई आवश्यक आहे, हे एका केंद्रीय मंत्र्याचे बोलणे सूचक आहे. कारण, पंजाबची पुनरावृत्ती इतर राज्यांमध्ये होऊ शकते आणि पंतप्रधाना अडवले जात असेल तर इतर केंद्रीय मंत्र्यांनाही अशा प्रकारांना सामोरे जावे लागू शकते. ही त्यामागची चिंताही त्यामागची आहेच!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Speech: असत्य बोलणं मोदी साहेबांचे वैशिष्ट्य... माढ्याच्या सभेतून शरद पवारांचा प्रहार; केंद्र सरकारवर टीकास्त्र

Today's Marathi News Live : पुण्यात भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस विरोधात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

Reasons for Obesity : 'या' कारणंमुळे तुमचे वजन झपाट्याने वाढतंय

Gold Smuggling : मुंबई विमानतळावर गुदद्वार, अंतर्वस्त्रातून सोने तस्करी; कस्टम विभागाकडून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

Vande Bharat Metro: वंदे भारत मेट्रोचा फस्ट लूक व्हायरल; लवकरच प्रवाशांच्या सेवेत, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT