मयुरेश कडव
बदलापूर : बदलापूरजवळच्या जांभिळघरमध्ये दर्शना दामले या गृहिणीने पाच एकर क्षेत्रात मिश्र शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांनी आपल्या शेतीत आंबा, काजू, फणस, नारळ अशा फळबागेसोबत भाजीपाला आणि पशुपालन केले आहे. मिश्र शेतीमुळे शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दर्शना दामले यांची बदलापूरजवळच्या जांभिळघरमध्ये ५ एकर जागा आहे. या जागेत त्यांनी सर्वात आधी आंब्यांच्या झाडांची लागवड केली. दापोली कृषी विद्यापीठातून १०० आंब्याची झाडं आणून लावली. आजच्या घडीला त्यांना प्रत्येक झाडापासून किमान ५०० ते ६०० फळांचे उत्पादन मिळत आहे. याच पद्धतीने त्यांनी आपल्या फळबागेत नारळ, काजू, फणस, चिक्कू, केळ तसेच इतर झाडं लावली आहेत. फळबागेतील नारळांपासून त्या घरच्या घरीच तेल बनवतात.
कुक्कुटपालन, पशुपालनाचा जोड
शिवाय त्यांनी ३० गुंठ्यात भातशेती तर २० गुंठ्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे. महत्वाचे म्हणजे केवळ फळबाग आणि भाजीपाल्यावरच अवलंबून न राहता दर्शना दामले यांनी शेतीला कुक्कुटपालन आणि पशुपालनाची जोड दिली. त्यांच्याजवळ १० गीर गायी आणि ६ म्हशी आहेत. शिवाय कुक्कुटपालनावरही त्यांनी भर दिला. पशुधनामुळे फळबागेसाठी लागणाऱ्या शेणखताची तिथेच उपलब्धता झाली. गुरांचं चांगल्या प्रकारे संवर्धन व्हावं यासाठी त्यांनी उत्तम दर्जाचा गोठा बांधला असून चारा- पाण्यासाठी चांगली सोय केली.
पूर्णपणे सेंद्रिय उत्पन्न
दर्शना दामले यांच्या शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पूर्णपणे सेंद्रीय शेतीवर भर दिला. त्या शेतीत शेणखत, गोमूत्र, झाडांचा पालापाचोळा तसच गांडुळ खताचाच वापर करतात. त्यामुळे मिळणारे उत्पन्न हे पूर्णपणे सेंद्रीय असते. आजच्या घडीला आजारांपासून दूर राहायचं असेल तर विषमुक्त शेती ही काळाची गरज असल्याचं दामले यांचं म्हणणं आहे. २०९९ मध्ये दर्शना दामले यांची कृषी विभागाच्या विदेश अभ्यास दौऱ्यात निवड झाली. या दौऱ्यात त्यांनी सोलार एनर्जी, बायोगॅसचे महत्व ओळखलं आणि त्यातूनच प्रेरणा घेत ५ केव्हीचा सोलार प्लँट उभारला. त्यामुळे त्यांच्या फार्ममधील सर्व उपकरणं ही सौरउर्जेवरच चालतात. सौरउर्जेमुळे वीजबिलावर होणाऱ्या खर्चात मोठी कपात झाली. केवळ शेतीपुरताच मर्यादित न राहता दामले यांनी यशस्विनी महिला स्वयं सहाय्यता गटामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकारही घेतला.
कृषी विभागाची मदत
दर्शना दामले यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यांनी याठिकाणी मसाल्याची पिकं तसच औषधी वनस्पतींचीही लागवड केली. शेतकऱ्यांना ठोस उत्पन्न हवं असेल तर त्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र शेतीची कास धरायला हवी; असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या या यशात कृषी विभागाचाही मोलाचा वाटा राहिलाय. कृषी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन आणि शासकीय स्तरावरून देऊ केलेली मदत त्यांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.