मयुरेश कडव
बदलापूर : बदलापूर जवळच्या सागाव येथे एका निवृत्त दांपत्याने ओसाड माळरानात आंब्याची बाग फुलवली आहे. शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून त्यांनी आपल्या जागेत शेततळे खोदून घेतले होते. यातून पाण्याची सुविधा झाल्याने सहा एकरचा परिसर हिरवागार झाला आहे. प्रामुख्याने या जागेवर आंब्याची बाग फुलवली असून यातून शाश्वत उत्पन्नाची सोय झाली आहे.
नवी मुंबईत राहणाऱ्या कालिंदी सातव या निवृत्त शिक्षिकेने आपल्या पतीच्या मदतीने बदलापूर जवळच्या सागावात काही वर्षांपूर्वी ६ एकर माळरान जागा विकत घेतली. जागा घेतल्यानंतर येथे पाण्याची कोणतीही सुविधा नव्हती. पाणी नसल्याने या जमिनीवर शेती करणं अत्यंत अवघड होतं. त्यांना शेतीची आवड असल्यानं त्यांनी स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या मार्फत मागेल त्याला शेततळे याचा लाभ घेतला.
मागेल त्याला शेततळं या योजनेच्या माध्यमातून आपल्या जागेत २५ बे २० फुटांचं शेततळं खोदून घेतलं. शिवाय शासकीय अनुदानातूनच पाच एचपीचा सोलर पंप देखील याठिकाणी बसवून घेतला. पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर त्यांनी आपल्या जागेत १०० आंब्याची झाडे लावली. माळरानच्या जागेवर आंब्याची बाग फुलविली असून या फळ बागेतून त्यांना शाश्वत उत्पन्न मिळणार, हे निश्चित झाले आहे.
भाजीपाल्याचीही केली लागवड
आंब्याची बाग फुलविण्यासोबतच त्यांनी आपल्या जागेत मिरची, वांगी, टोमॅटो असे भाजीपाल्याचं उत्पन्न देखील घेण्यास सुरवात केली. हा भाजीपाला घरासाठी उपयोगी पडत असून बाजारात याची विक्री केली जात असल्याने यातूनही उत्पन्न मिळत आहे. एका निवृत्त दाम्पत्याने ओसाड माळरानात फळबाग फुलवून शेतीची कास धरल्याने परिसरातील नागरिकांसह शासकीय अधिकाऱ्यांकडूनही त्यांचं कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.