T20 World Cup, Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. टी २० वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये जवळजवळ स्थान निश्चित झाले आहे. अशात आता टीम इंडिया हा टी २० वर्ल्डकप जिंकेल, असं चाहत्यांना मनापासून वाटतंय. चार योगायोग असे आहेत की, ज्यातून टीम इंडिया टी २० वर्ल्डकप विजेतेपद पटकावणार, असे संकेत मिळत आहेत.
टी २० वर्ल्डकप यावेळी भारतीय क्रिकेट संघच (Team India) जिंकणार, असा ठाम विश्वास चाहत्यांना आहे. चार योगायोग जुळून आले तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ नक्कीच चॅम्पियन ठरेल, असं चाहत्यांना मनापासून वाटत आहे. चार योगायोग असले तरी, त्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. पण तरीही जे हार्डकोर फॅन्स आहेत, त्यांना तर टीम इंडियाच विजेतेपदाची ट्रॉफी उंचावेल, असा विश्वास आहे.
२०११ मध्ये वर्ल्डकप भारतानं जिंकला होता. पण वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्याच्या आधी त्यावेळचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) सर्वात भरवशाचा गोलंदाज दुखापतीमुळं स्पर्धेबाहेर गेला होता. तो गोलंदाज होता प्रवीण कुमार. यावेळी जसप्रीत बुमराहच्या बाबतीतही तेच झालंय.
दुसरं म्हणजे, २०११ च्या वर्ल्डकपमध्ये कर्णधार धोनीनं संपूर्ण स्पर्धेत मोठी खेळी केली नव्हती. पण फायनलमध्ये त्याने ९० पेक्षा जास्त धावा करून मॅच विनिंग खेळी केली होती. त्यात तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरीही ठरला होता. मॅच विनिंग षटकारही त्याच्याच बॅटमधून निघाला होता. आता यावेळी कर्णधार रोहित शर्माच्या बाबतीतही तेच होतंय. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये त्याची खेळी जेमतेम राहिली आहे.
धोनीची फलंदाजी आणि गोलंदाज प्रवीण कुमारबद्दल तर चर्चा झालीच, पण आणखी एक योगायोग किंवा समानता म्हणता येईल. २०११ वर्ल्डकप स्पर्धेत क्वार्टर फायनलपर्यंत भारताने बांगलादेश आणि नेदरलँडला पराभूत केलं होतं. २०२२ मध्येही दोन्ही संघांनाच पराभूत केलं आहे. २०११ मध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेने हरवले होते. २०११ मध्ये भारताने सेमिफायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं होतं. यावेळी तर सुपर १२ मध्येच भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे.
टीम इंडियाची वर्ल्डकपमधील आतापर्यंतची कामगिरी
टीम इंडिया सद्यस्थितीत चांगली कामगिरी करत आहे. चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. ग्रुप २ मध्ये पहिल्या स्थानी आहे. ६ नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध लढत होणार आहे. सहा वर्षांपूर्वी झिम्बाब्वेने एका सामन्यात भारताला मात दिली होती. पण तेव्हाची स्थिती आणि आताची परिस्थिती यात खूप फरक आहे. आता भारताने झिम्बाब्वेला नुसते पराभूत केले तरी, सेमिफायनलमध्ये पोहोचणे निश्चित आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.