Cricket Viral Video: बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेत राडा होणं साहजिक आहे. कारण दोन्ही संघातील खेळाडू केवळ जिंकण्यासाठीच खेळत असतात. अशावेळी खेळाडूंमध्ये बाचाबाची आणि वाद होतात. मात्र २०१८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत, भारत - ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंमध्ये नव्हे तर भारतीय संघातील खेळाडूंमध्ये वाद रंगला होता.
२०१८ मध्ये झालेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफीतील दुसऱ्या सामन्यात रवींद्र जडेजा आणि ईशांत शर्मा आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
जेव्हा ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा आले आमने सामने..
ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा या दोघांमध्ये काय घडलं? कशामुळे हा वाद झाला होता? हे कळू शकलेलं नाहीये. पण तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर त्यावरून असे दिसून येत आहे की, योग्य ठिकाणी फिल्डींग न लावल्याने दोघांमध्ये वाद झाला होता.
दोघेही एकमेकांना हातवारे करताना दिसून येत आहेत. तसेच दोघांमध्ये बाचाबाची देखील सुरू आहे. संघातील इतर खेळाडू मध्ये आले नसते तर हा वाद आणखी चिघळला असता.
समालोचकांच्या म्हणण्यानुसार हा वाद तब्बल ९० सेकंद सुरू होता. यादरम्यान दोघेही एकमेकांना बोट दाखवताना दिसून आले. त्या सामन्यात ईशांत शर्माने अप्रतिम गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा घाम काढत त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी रवींद्र जडेजा बदली खेळाडू म्हणून मैदानात आला होता.
भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघातील खेळाडू या मालिकेत जोरदार फॉर्ममध्ये होते. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ३१ धावांनी जोरदार विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. (Latest sports updates)
दुसऱ्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले होते. तिसरा कसोटी सामना भारतीय संघाने १३७ धावांनी जिंकला होता. यासह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने इतिहासाला गवसणी घालत २-१ ने मालिका खिशात घातली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.