दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकविरोधात राजधानी दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर ३१ मार्च रोजी इंडिया आघाडीची मोठी सभा होणार आहे. या रॅलीसाठी दिल्ली पोलिसांकडून तसेच निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेनंतर विरोधक केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यासोबतच निवडणुक रोख्यांच्या घोटाळ्यावरुन केंद्र सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवाचा नारा देत इंडिया आघाडी दिल्लीच्या रामलीला मैदानावर विराट सभा घेणार आहे.
या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, डेरेक ओब्रायन, त्रिची शिवा, चंपाई सोरेन, कल्पना सोरेन, डी राजा, दीपंकर आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी नेते सहभागी होणार आहेत.
दरम्यान, कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना १ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाई ही अघोषित आणीबाणी असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. याविरोधात इंडिया आघाडी रामलिला मैदानातून मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.