Explainer : मेक इन इंडियामुळे खरंच औद्योगिक क्रांती झाली का? रोजगार मिळाले का? काय सांगतात १० वर्षातील आकडे, वाचा सविस्तर

Make In India : 2014 मध्ये एनडीए सरकारने मेक इन इंडिया अभियानाची घोषणा केली होती. गेल्या १० वर्षात या अभियानाच्या माध्यमातून भारताने मोबाईल, ऑटोमोबाईल, औषधे, संरक्षण आणि स्टार्टअप्समध्ये मोठी प्रगती केली आहे.
Explainer
ExplainerSaam Digital
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात 2014 मध्ये केंद्रात सत्ता स्थापन झाली आणि याच वर्षी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा करण्यात आली. मोदी सरकारने सुरू केलेल्या या अभियानावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली झाली होती. मात्र केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी अभियानामुळे देशात नक्की उद्योगधंदे वाढले का? विदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली का? आणि या सर्वांमधून गेल्या १० वर्षात मोदी सरकारने दिलेल्या रोजगाराच्या आश्वासनाची पुर्तता झाली का? पाहूयात त्यावरचा एक रिपोर्ट...

भारताकडे जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पाहिलं जातं. त्यात 'मेक इन इंडिया' अभियानाचाही वाटा आहे. 25 सप्टेंबर 2014 रोजी सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून भारताने आज अनेक क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे. मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक मिळाली असून भारत आज जागतिक स्तरावर उत्पादन केंद्र म्हणून उदयास आला आहे.

९९ टक्के मोबाईलचं भारतात उत्पादन

‘मेक इन इंडिया’ अभियानाच्या यशस्वीतेचे एक मुख्य उदाहरण म्हणजे मोबाईल उत्पादन क्षेत्र. भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक बनला आहे. 2014 मध्ये जेव्हा या अभियानाची सुरुवात झाली होती, त्यावेळी देशात फक्त दोन मोबाईल कंपन्या होत्या. परंतु, आता या आकड्यात दहा पट वाढ झाली आहे आणि 200 पेक्षा जास्त मोबाईल उत्पादन कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये ऍपलसारख्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचाही समावेश आहे.

मोबाईल निर्यातीमध्येही मोठी वाढ झाली आहे. 2014 मध्ये भारत फक्त 1556 कोटी रुपयांच्या मोबाईलची निर्यात करत होता, तर 2023 मध्ये हा आकडा 1.2 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे भारत आता मोबाईल उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण देश बनला आहे. यातील एक महत्वाची बाब म्हणजे भारतात वापरल्या जाणारे 99 टक्के मोबाईल आता देशातच तयार होतात.

जगातील चौथ्या क्रमांकाचे ऑटोमोबाईल क्षेत्र

‘मेक इन इंडिया’ अभियानामुळे भारताचा ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योग देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2023 मध्ये भारत हा जगातील चौथी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपन्यांनी भारतात आपली उत्पादने सुरू केली आहेत. यातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मितीही झाली आहे.

ऊर्जा उत्पादन क्षेत्रात मोठी कामगिरी

भारताने पुनर्निर्मित ऊर्जा (Renewable Energy) क्षेत्रात देखील मोठी कामगिरी केली आहे. 'मेक इन इंडिया' अभियानानंतर या क्षेत्रात 400 टक्क्यांनी उत्पादन क्षमता वाढली आहे. भारत आता जगातील चौथा सर्वात मोठा पुनर्निर्मित ऊर्जा उत्पादक देश आहे. या क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याच्या उद्दिष्टाने भारताने पीव्ही सोलर मॉड्यूल्सच्या उत्पादनासाठी 30,370 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे.

औषध उत्पादनात मोठी झेप

भारताने लसीकरण क्षेत्रात देखील जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. आज जगभरात वितरित होणाऱ्या लसींपैकी 50 टक्के लस भारतातून निर्यात केली जाते. 2014 मध्ये भारत इतर देशांवर अवलंबून होता. परंतु आता निर्यातीमध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे. औषध उद्योगात देखील भारताने 29,482 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे, ज्यामुळे भारताचा औषध निर्यातीतही प्रचंड वाढली आहे.

Explainer
Explainer : नाही म्हणायची हीच योग्य वेळ, भारतातील कंपन्यांमध्ये का वाढतोय कामाचा तणाव? वाचा सविस्तर

खेळण्यांची 32.57 कोटी डॉलरची निर्यात

एकेकाळी आयातीवर अवलंबून असलेल्या खेळण्यांच्या उद्योगात भारताने ‘मेक इन इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. 2014-15 मध्ये खेळण्यांची निर्यात 9.62 कोटी डॉलर होती, जी 2023-24 पर्यंत 239 टक्क्यांनी वाढून 32.57 कोटी डॉलरवर पोहोचली आहे. भारताने 2020 मध्ये लागू केलेल्या नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर टॉयजमुळे निर्यात क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

संरक्षण क्षेत्रातील निर्यात दुप्पट

मेक इन इंडिया अभियानाच्या माध्यमातून भारताच्या संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे. 2023-24 मध्ये भारताची संरक्षण निर्यात 21,083 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या क्षेत्रात सुरुवातीला भारताची निर्यात केवळ 500-600 कोटी रुपये होती, जी आता 21 पट वाढली आहे. यामुळे भारत आता अनेक देशांना शस्त्रास्त्रे, उपकरणे आणि तंत्रज्ञान निर्यात करत आहे. याशिवाय, भारताचे एकूण संरक्षण उत्पादन 46,429 कोटी रुपयांवरून 1,27,264 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, जे 10 वर्षांत एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.

सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रातील यश

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने 'मेक इन इंडिया' अभियानाच्या माध्यमातून सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. या क्षेत्रात भारताने 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली असून, अनेक मोठे उत्पादन केंद्र उभारले जात आहेत. यामुळे भारत हा जागतिक तंत्रज्ञान बाजारातही आपली उपस्थिती मजबूत करीत आहे. याशिवाय, केंद्र सरकारने 76,000 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टम डेव्हलपमेंट योजनेला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे पुढील काही वर्षांत भारत सेमीकंडक्टर उद्योगातही अग्रगण्य बनेल.

स्टार्टअप्सची क्रांती

मेक इन इंडिया अभियानामुळे भारतातील स्टार्टअप्समध्येही मोठी वाढ झाली आहे. 2014 मध्ये केवळ 350 स्टार्टअप्स असताना, आता या आकड्याने 1.48 लाखांपर्यंत झेप घेतली आहे. यातील 45 टक्के स्टार्टअप्स हे लहान शहरांमधून आले आहेत. यामुळे केवळ महानगरांपुरते सीमित न राहता, संपूर्ण भारतात उद्योग आणि इनोव्हेशनला चालना मिळाली आहे.

MSME क्षेत्रातात 1.85 कोटी युनिट्सच्या महिल्या बनल्या मालक

मेक इन इंडिया अभियानामुळे एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्रातही मोठा बदल दिसून आला आहे. आज जवळपास 4.91 कोटी एमएसएमई नोंदणीकृत आहेत, आणि यातील 1.85 कोटी युनिट्सच्या मालक महिला आहेत. या युनिट्सद्वारे 21.17 कोटींहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे, आणि या क्षेत्राचा भारताच्या GDP मध्ये 30.1 टक्के वाटा आहे.

रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक

पीएलआय (Production Linked Incentive) योजनेद्वारे 1.28 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, ज्यामुळे 8.5 लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून रोजगार निर्मितीतही मोठी भर पडली आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे.

‘मेक इन इंडिया’ अभियानाच्या माध्यमातून भारताने औद्योगिक, आर्थिक, आणि सामाजिक क्षेत्रात एक अभूतपूर्व क्रांती घडवली आहे. या अभियानामुळे भारत आज जागतिक उत्पादन बाजारपेठेत एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवू शकला आहे. मोबाईल, ऑटोमोबाईल, लस, औषध, संरक्षण, सेमीकंडक्टर आणि स्टार्टअप्स या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत भारताने जागतिक पातळीवर आपली छाप सोडली आहे.

Explainer
Explainer : नाही म्हणायची हीच योग्य वेळ, भारतातील कंपन्यांमध्ये का वाढतोय कामाचा तणाव? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com