कल्याण : रेल्वेच्या कल्याण पूर्व भागातील जमिनीवर तब्बल ४० वर्षांपासून राहत असलेल्या झोपडीवासींना तडकाफडकी बेघर करू नये. त्याऐवजी म्हाडा, झोपडपट्टी विकास प्राधिकरण (एसआरए) किंवा खासगी विकासकामार्फत झोपडीवासींचे पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
हे देखील पहा :
मध्य रेल्वे (Railway) मार्गावर कल्याण जंक्शन प्रसिद्ध आहे. रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील रेल्वेच्या काही जमिनीवर हजारो गरीब नागरिकांची घरे वसली आहेत. किमान ४० वर्षांपासून झोपडी, चाळी स्वरुपात गरीब बांधव राहत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेने (KDMC) घरांना मालमत्ता कर लागू केला असून, पाणी बिलेही आकारली जात आहेत. या घरांना अनेक वर्षांपासून वीजपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत रेल्वेमार्फत अचानक हजारो घरमालकांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा देण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये चीड व भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
एवढे वर्ष राहिल्यानंतर कोठे जायचे, असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. कोरोना (Corona) महामारीच्या काळात नागरिकांना बेघर करणे अन्यायकारक आहे. तर, या रहिवाशांवर बळाचा वापर केल्यास कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची भीती आहे. तरी या संदर्भात आपण माणुसकीची व सहानुभुतीची घ्यावी, असे आवाहन आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे.
या भागातील जमिनीच्या काही भागावर म्हाडा (MHADA), एसआरए (SRA) योजना किंवा खासगी विकासकामार्फत योजना राबविल्यास, हजारो नागरिकांना दिलासा मिळू शकेल. तसेच नागरिकांचे पुनर्वसन केल्यानंतर रेल्वेला मोठया प्रमाणात जागा उपलब्ध होईल. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांबरोबरच पुनर्वसित वसाहतीतील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील, याकडे आमदार गणपत गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे. कल्याण (Kalyan) पूर्व भागातील नागरिकांच्या पुनर्वसन योजनेवर सविस्तर चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.