अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी केलेली टीका आणि प्रचार दौऱ्यावरून शरद पवारांनी जोरदार निशाणा साधला आहे. 'पंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्रात आले? सहाव्यांदा की सातव्यांदा आले आहेत, असं म्हणत शरद पवारांनी मोदींच्या प्रचार दौऱ्यावरच टीकास्त्र सोडलं.
शरद पवारांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्या प्रचारसभेवरून जोरदार टीका केली. शरद पवार म्हणाले,' पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा राज्यात आले? ६ की ७ वेळा आले आहेत. माझे व्यक्तिगत संबंध वेगळे आहेत आणि विरोधातील भूमिका वेगळी आहे. संसदीय लोकशाही मोदींमुळे संकटात आली आहे. केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं. यामागे केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही'.
पंतप्रधान मोदींच्या ऑफरवर शरद पवार म्हणाले, 'त्यांचा लोकशाहीच्या विचारधारेचा विश्वास नाही, असा समज लोकांचा पक्का झाला आहे. त्या लोकांसोबत जाणं , व्यक्तीगत सोडा राजकीय माझ्याकडून शक्य होणार नाही. मी हेही म्हटलं की, गांधी आणि नेहरुंची विचारधारा आम्हाला स्वीकाहार्य आहे'.
पंतप्रधान मोदींच्या मुस्लीम समाजाबाबतच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले,'मी PM मोदींचे वक्तव्य मुस्लीम समाजाबाबत ऐकलं. हा देश एकसंघ ठेवायचा असेल, तर सर्वांना एकत्रित घेऊन देश पुढे न्यावा लागेल. एका समाजाबाबत आपण वेगळं मत मांडलं तर ऐक्य राहणार नाही. मोदींची अलीकडची वक्तव्ये ही समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. तिथे मी आणि आमचे सहकारी असणार नाहीत'.
'आतापर्यंत झालेल्या मतदानावरुन मोदींचे विचार या विरोधात जनमत तयार होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहे. त्यांची अस्वस्थता त्यांच्या वक्तव्यातून दिसते किंवा संभ्रम निर्माण करणारी आहेत, असे ते म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.