पुणे, ता. १० जून २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापनदिन. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या गटाचा अहमदनगरमध्ये हा वर्धापनदिन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. त्याआधी पुण्यामध्ये पक्ष कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी विधानसभेत सत्ता खेचून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
"आजचा दिवस पक्ष स्थापनेला २५ वर्ष झाले, याबाबत आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे. एक अशी संघटना उभी केली या संघटनेला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर एक प्रकारचा नवा इतिहास तयार केला. अनेक गावामध्ये ज्यांच्या घरात सत्तेशी, राजकारणाशी संबंध नसणारे पण सामाजिक बांधिलकी असणारे अनेक तरुण पुढे आले अन् त्यातून त्या भागाचे नेतृत्व पुढे आले. ते नेतृत्व त्या भागापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यावर, राज्यपातळीवर गेले.
"आज देश एका वेगळ्या स्थितीतून निघाला आहे. देशाची सत्ता मोदींच्या हातात आली पण खऱ्या अर्थाने निकाल मोदी सरकारच्या सोईचा नव्हता. संसदेत त्यांचे बहुमत नाही, अशी स्थिती निर्माण झाली. त्यांना इतर पक्षांची मदत झाली नसती तर सरकार आले नसते. गेल्या पाच वर्षात दोन व्यक्तींनी सरकार चालवले, सुदैवाने देशातील जनतेने याची नोंद घेऊन त्याप्रकारे मतदान केले, त्यामुळे सामान्य माणूस तुमच्या माझ्यापेक्षा अगदी शहाणा आहे. जागरुक आहे," असे शरद पवार म्हणाले.
"गेले २५ वर्ष आपण विचारधारा वाढवण्याचा प्रयत्न केला. आता मजबुतीने आपण हा पक्ष आणखी पुढे नेऊया. तीन महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येईल. तुमची, माझी सगळ्यांची जबाबदारी. आता एकच लक्ष, ते म्हणजे तीन- चार महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात असेल, अशी भूमिका घेऊ. या सत्तेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना, शेवटच्या घटकांपर्यंत कसा होईल याची काळजी घेऊ," असा निर्धार शरद पवारांनी व्यक्त केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.