
Sharad Pawar Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर त्यांनी एका ज्योतिषाकडून आपलं आणि राज्याचं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या कृतीचा अनिसने जाहीर निषेध केला असून विरोधकांनीही त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंना जोरदार टोला हाणला आहे. (Latest Marathi News)
स्वत: बद्दल आत्मविश्वास नसला, की ज्योतिषाकडे जावं लागतं, असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे. शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी हा टोला लगावला आहे. याशिवाय त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील टीका केली आहे. शिवरायांबाबत वक्तव्य करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मर्यादा सोडली. असं म्हणत त्यांनी राज्यपाल कोश्यारींवरही निशाणा साधला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार दोन महिन्यात कोसळेल का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारला. यावर उत्तर देताना पवार म्हणाले, 'मी काही ज्योतिषी नाही. मी काही सांगू शकणार नाही. माझा त्याच्यावर विश्वास नाही. तसंही मी हात दाखवायला कुठे जात नाही. आपण आता नवीन गोष्टी पाहत आहोत. जे महाराष्ट्रात कधी नव्हतं, असं म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
'आसाममध्ये काय घडलं हे सर्व देशाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा आसामची ट्रीप होणार असल्याचं मी वाचलं. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम बंद करुन शिर्डीला जाणं आणि नंतर सिन्नरला जाऊन कोणाला तरी हात दाखवणं या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. पुरोगामी विचारांचं राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. पण या गोष्टीचा स्वीकार करत नाही हे जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही', असंही शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवारांची राज्यपालांवर टीका
राज्यपाल भगतसिह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचाही शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. 'राज्यपाल या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणं गरजेचं असते. सध्याच्या राज्यपालांनी अनेकवेळा अशी वक्तव्ये केली त्यावेळी आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नव्हतो. मात्र, आता शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यायला हवी', असं पवार यांनी म्हटलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.