
मुंबई : लवकरच कार्यान्वित होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाशी मुंबईला लवकरच जलमार्गाने जोडण्यात येणार आहे. दोन्ही शहरांना जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येणार असून त्यासाठी गरजेच्या ठिकाणी जेटी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावे, अशी सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी काल सोमवारी दिली. वॉटर टॅक्सीमुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळाला केवळ ४० मिनिटांत पोहोचण शक्य होणार आहे.
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढिये यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. वॉटर टॅक्सी वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या शक्यतांवरही यावेळी विस्तृत माहिती घेण्यात आली.
‘वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्याटप्प्याने सुरू करावी, तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत, मालवाहतुकीसाठीही जेटी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत,’ अशा सूचना राणे यांनी दिल्या. सध्या मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्ग आणि विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्ग असे दोन मार्ग तसेच, हार्बर रेल्वे मार्ग उपलब्ध आहेत.
रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळ असा वॉटर टॅक्सीचा प्रस्ताव असून त्या मार्गात इतर थांब्यांचीही चाचपणी यावेळी करण्यात आली. या प्रवासासाठी इलेक्ट्रिक बोटींचा वापर करण्यात येणार असल्याने प्रदूषण कमी होण्यास तसेच पर्यावरणाला पूरक असा नवा मार्ग खुला होणार आहे. तसेच, कुठलाही कोंडीशिवाय वेगात नवी मुंबई गाठणे नागरिकांना शक्य होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.