मुंबईत आठवडाभर पावसाने थैमान घातले होते, समुद्राला उधाण देखील आले होते.याचसोबत किनाऱ्यालगत जमलेल्या कचऱ्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल देखील झाले. मुंबईकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. शिवाय सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर कचऱ्यांचे ढिग लागलेलेच असतात. यासगळ्याची सखोल दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील वाढत्या कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला सार्वजनिक ठिकाणी कचरा किंवा प्लॅस्टिक फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कठोर शिक्षा करण्याची वेळ आलीच तर गु्न्हे देखील नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. मानवी चुकीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि गंभीर नुकसान लक्षात घेता न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी आणि आरती साठे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. कांजूरमार्गचे डंपीग ग्राऊंडमधून पसरणारा घाणेरडा वास आणि त्यासंबंधित केल्या गेलेल्या तक्रारींना केंद्रस्थानी ठेवून न्यायालयाने हा कडक निर्णय घेतला आहे. असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मुंबईतून वाहणाऱ्या बऱ्याच नदींचे रूपांतर हे नाल्यांमध्ये झाले आहे. प्लॅस्टिक, घन कचरा वाहणारे हे नाले थेट समुद्राला जाऊन मिळतात. त्यामुळे समुद्रांचे देखील रूपांतर नाल्यांमध्ये होऊ नये म्हणून वेळीच सावध होणे गरजेचे आहे. अशी मत उच्च न्यायालयाने मांडले.
मुंबईला स्वच्छ ठेवणे हे केवळ महापालिकेचेच काम नाही आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्ड स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवणे हे नगरसेवकांची देखील जबाबदारी आहे. त्यानुसार कामाची विभागणी केली जावी असा निर्देश हाय कोर्टाने दिला आहे. त्याचसोबत नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी वॉर्डनुसार हेल्पलाईन नंबर दिला जाणार आहे.