
कस्तुरबा रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकावरून वाद निर्माण झाला.
महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक वाटणाऱ्या अधिकाऱ्याच्या अंगावर पुस्तक फेकले.
राजेंद्र कदम यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून अदखलपात्र गुन्हा नोंदवला गेला.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या घटनेचा निषेध केला आणि प्रबोधनकारांचा अपमान असल्याचे सांगितले.
निवृत्ती सोहळ्यानिमित्त प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले 'देव आणि देवळांचा धर्म' हे पुस्तक कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वाटल्याने वाद निर्माण झाला आहे. महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक वाटणाऱ्या कक्ष अधिकाऱ्यांनी माफी मागूनही त्यांच्या अंगावर पुस्तक फेकून त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र कदम (५८ वर्षे) हे कस्तुरबा रुग्णालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते ३० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांनी २८ ऑगस्ट रोजी आपल्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे 'देव आणि देवळांचा धर्म' तसेच दिनकरराव जवळकर यांचे 'देशाचे दुश्मन' या पुस्तकांचे वाटप केले होते. यानंतर २९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविकेने राजेंद्र कदम यांना कक्षात बोलावले. तेथे अन्य महिला परिचारिका आणि अन्य कर्मचारी देखील उपस्थित होते.
या पुस्तकांमुळे आमच्या भावना दुखावल्या असे सांगत महिलांनी राजेंद्र कदम यांना असे पुस्तक का वाटले? म्हणून जाब विचारला. महिला आक्रमक झाल्याने कदम यांनी हात जोडून माफी मागितली. परंतू त्यानंतरही त्यांच्या अंगावर प्रबोधनकारांचे पुस्तक फेकून मारण्यात आले. राजेंद्र कदम यांनी रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. मात्र रुग्णालयाने कारवाई न केल्याने अखेर कदम यांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे राजकारण तापले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, 'हा मुर्खपणा आहे. मुर्खपणाच्या सगळ्या हद्दी पार केल्यानंतर जे होऊ शकतो तो हा प्रकार आहे. मुळात यांना प्रबोधनकार माहिती आहेत का? त्यांनी प्रबोधनकार वाचले आहेत का? प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला सुधारणावादी गोष्टींकडे नेले. समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात त्यांनी लढा दिला. त्या प्रबोधनकारांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, असे मला वाटते.
तसंच, 'सनातन धर्माच्या नावाखाली काही लोक समाजात विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे समाजासाठी घातक आहे. यांना मुळात सनातन धर्म देखील माहिती नाही आहे. त्या महिलेने प्रबोधनकारांना हिंदूत्वविरोधी म्हणणे म्हणजे मुर्खपणा आहे. त्या महिलेची तक्रार आमचे पदाधिकारी योग्य पद्धतीने करतील.', असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.