मुंबई : देशभरासह राज्यात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. शिर्डीतील साईबाबा, नाशिकमधील काळाराम मंदिरातही भाविकांमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक राजकीय पक्षांनीही रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या रामनवमीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. या पोस्टमधून काही पक्षांनी श्रीरामाचे अस्तित्व नाकारलं, असं म्हणत राज ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली आहे.
राज ठाकरे सोशल मीडियावर पोस्टमध्ये काय म्हणाले?
श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम.
भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली.
ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो.
धर्म, राजकारण, ईश्वर ह्यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. ह्याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती. असो.
पण आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वाना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.