कल्याण : मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत दिवा रेल्वे स्टेशन तसेच दिवा-पनवेल व दिवा-वसई रेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या अशी मागणी केली आहे. दिवा रेल्वे स्टेशन (Railway Station) मध्य रेल्वे वरील महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून दिवा-वसई, दिवा-पनवेल, कोकण गोव्यासह इतर राज्यात गाड्या जातात. परंतु, दिवा (Diva) रेल्वे स्थानक व परिसरात अद्यापही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने काही सोयी-सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे,असे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी सांगितले.
हे देखील पहा :
यामध्ये प्रामुख्याने दिवा स्टेशनवरुन दररोज हजारो प्रवासी उपनगरीय लोकलने प्रवास करतात. सकाळच्या वेळी दिवा-मुंब्रा-कळवा या स्टेशनवर आधीच लोकल (Local) भरुन येत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. या आधी दिवा स्थानकामध्ये प्रवाशांचा उद्रेक होऊन आंदोलने झालेली आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी दिव्यावरुन छत्रपती शिवाजी टर्मिनस तसेच कर्जत-कसाऱ्यासाठी जलद (FAST) व धिम्या (SLOW) लोकल गाड्या सुरु कराव्यात. तसेच दिवा रेल्वे स्थानकावर दररोज १० हजारापेक्षा जास्त तिकिट विक्री होते. परंतु सध्या केवळ पश्चिमेला तिकिटघर असून दररोज प्रवाशांची मोठी लाईन लागलेली असते व तासंतास उभे राहून प्रवाशांना (Passengers) तिकिट काढावे लागते.
प्रवाशांच्या अडचणीचा विचार करुन दिवा पूर्वेला तिकिट घर (बुकींग ऑफीस) बांधण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तिकिटघर वाढविण्यात यावेत व पूर्वेकडील नवीन तिकिटघराचे काम तातडीने पूर्ण करावे. दिवा स्टेशन मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन असताना परिसरात मुलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. प्रवाशांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी रेल्वे स्थानक व परिसरासाठी सर्वकष आराखडा बनविण्यात यावा. त्यामध्ये सॅटीस, शौचालये, पाणी पुरवठा, इक्सिलेटर यांचा प्राधान्याने समावेश करावा.
तसेच दिवा-वसई तसेच दिवा-पनवेल दरम्यान मोठ्या प्रमाणात गृहसंकुले व औद्योगिक विकास झालेला आहे. नोकरी व व्यवसायानिमित्त या परिसरात जाणाऱ्या नागरिकांचे अपुऱ्या रेल्वे सेवेमुळे हाल होतात. त्यामुळे दिवा-पनवेल व दिवा-वसई दरम्यान तांत्रिक अडचणी दूर करुन लोकल सेवा सुरु करावी.सध्या दिवा-वसईसाठी सकाळी ५:३० नंतर १०:१५ ला गाडी आहे.
मधल्या काळात नोकरी निमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे गाड्यांमधील अंतरामुळे हाल होतात. लोकलसेवा सुरु करण्यास विलंब लागत असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवा-वसई साठी सकाळी ५:३० ते १०:१५ दरम्यान नवीन दोन गाड्या सुरु कराव्यात. कोविड लॉकडाऊन पासून JTBS जनसाधारण तिकिट बुकिंग सेवा बंद आहे. दिवा स्थानकातील अपुऱ्या तिकिट खिडक्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे तातडीने JTBS बुकिंगसेवा सुरु करावी. प्रवाश्यांच्या या मागण्या घेऊन मनसे आमदार यांनी केंद्रीय मंत्री यांची भेट घेतली.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.