
Uddhav Thackeray Speech: उद्धव ठाकरे यांची भव्य सभा काल मालेगावात पार पडली. या सभेकडे सर्वांचंच लक्ष होतं. कारण या सभेतून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून केलेल्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यामुळे सर्वांच्या नजरा उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे लागल्या होत्या.
उद्धव ठाकरे यांनी जवळपास ३६ मिनिटांचं भाषण केलं. मात्र यात त्यांनी राज ठाकरेंबाबत एक चकार शब्द काढला नाही. तर याउलट राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं गुढीपाडवा मेळाव्यातील भाषण जवळपास ४८ मिनिटांचं होतं. यात ते जवळपास अर्धा वेळ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरच बोलले. मग असं काय झालं की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंविरोधात बोलणं टाळलं. याबाबत थोडी सविस्तर माहिती घेऊया.
शेतकरी, स्थानिक प्रश्नांना झुकतं माप
पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांची सभा मालेगावात पार पडली. हा ग्रामीण भाग आहे. येथील राजकारण थोडं वेगळं आहे. या भागात काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस, कांदा आणि शेतमालाचे घसरलेले दर याशिवाय शेतकऱ्यांचे अनेक महत्त्वाचे विषय आहेत.
मालेगावात उद्धव ठाकरे यांच्या सभेला आलेली जनता ही मालेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातून जमली होती. यात सर्वाधिक शेतकरी असणार हे उद्धव ठाकरेंना माहिती असणार. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी सभेत अर्ध्याहून अधिक वेळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच जास्त. शेतकरी आणि ग्रामीण भागातील समस्यांवर, विषयांवर बोलणं त्यांच्यासाठी अधिक सोईचं होतं.
भुसे आणि कांदेंवर निशाणा
बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झालेले दोन बडे नेते याच भागातील आहे. त्यामुळे दादा भुसे आणि सुहास कांदे यांना टार्गेट केलं तर तेथील जनतेत योग्य मेसेज जाऊ शकतो. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाषणात दादा भुसे आणि सुहास कांदे या दोन्ही नेत्यांवर निशाणा साधला. राज ठाकरेंवर बोलून तेथील जनतेशी जास्त कनेक्ट कदाचित साधता आला नसता.
राज ठाकरेंच्या भाषणावर आधीच दिली होती प्रतिक्रिया
राज ठाकरे यांचं शिवाजी पार्कमधील भाषण झाल्यावर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ती प्रतिक्रियाही अगदी थोडक्यात होती. उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की, गेली अठरा वर्ष तेच घासून पुसून बोललं जात आहे. मी वांद्र्यातील मागील वर्षीच्या सभेतून उत्तर दिल्याची आठवण त्यांनी करुन दिली. म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर बोलून त्या मुद्द्यांला फार महत्त्व द्यायचं नव्हतं हे स्पष्ट आहे.
भाजप-शिंदे गटाला टार्गेट करणं जास्त सोईचं
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे सातत्याने भाजप नेते आणि शिंदे गटातील नेत्यांवर निशाणा साधत आहेत. उद्धव ठाकरेंना यातून जनतेचा पाठिंबा वाढत असल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून आपला मोर्चा राज ठाकरेंच्या दिशेने वळवणे फार फायद्याचं नाही, हे देखील उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं असावं.
आरोप-प्रत्यारोपांतून मुद्दा भरकटला असता
काल उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं असतं तर आज मनसे नेत्यांची फौज त्यांच्यावर तुटून पडली असती. त्यामुळे राज ठाकरे आणि मनसे पुन्हा चर्चेत असते. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांमध्ये भाजप-शिंदे गटावरून लक्ष काहीसं भरकटलं असतं. त्याचा तोटाच ठाकरे गटाला झाला असता, याचा अंदाजही उद्धव ठाकरेंना असावा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.