अभिजित देशमुख,मुंबई
केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्व्हेक्षण २०२४-२५ मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेची पीछेहाट झाली. मागील वर्षी अस्वच्छतेचा शिक्का पुसण्याच्या प्रयत्नात या शहराने २२ व्या स्थानी मजल मारली होती. मात्र यंदा हे नामांकन २ अंकांनी घसरले असून यंदा पालिकेला २४व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी, कचऱ्याचा डोंगर हटविण्यासाठी तसेच शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे संकलन आणि विल्हेवाट यासारख्या प्रकल्पावर करोडोचा चुराडा केल्यानंतरही स्वच्छतेच्या सर्वच निकषात कल्याण डोंबिवलीची घसरण झाल्याचे दिसत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साली एका कार्यक्रमात कल्याण डोंबिवली हे देशातील सर्वात अस्वच्छ शहर असं म्हटलं होत. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी देखील आपल्या अजेंड्यावर हा शिक्का पुसण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. तर राज्य शासनाने रामदास कोकरे यांच्यासारखे स्वच्छतेसाठी वाहून घेतलेले उपायुक्त कल्याण डोंबिवली शहरात पाठवून शहराच्या प्रवेश द्वारावर असलेले डम्पिंग बंद करत कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प प्रत्यक्षात सुरु करण्यावर भर दिला.
शहरातील कचरा कुंड्या हटवून वेळच्या वेळी शहरातील कचरा उचलन्या बरोबरच कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. यामुळे पुढच्या काळात कल्याण डोंबिवली शहर स्वच्छतेच्या यादीत स्थान मिळवू शकले आहे. मात्र पहिल्या १० शहराच्या यादीत स्थान मिळविण्याचे स्वप्न अद्यापि कल्याण डोंबिवली शहराला पूर्ण करता आलेले नाही.
स्वच्छता, कचरा वर्गीकरण, संकलन आणि वाहतूक, कचरा प्रक्रिया, लँडफिल व्यवस्थापन, प्रक्रिया, सांडपाणी प्रक्रिया, पुनर्वापर आणि विष्ठा गाळ व्यवस्थापन यासारख्या निकषांवर भर दिला जातो . स्वच्छ भारत सर्व्हेक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्या पथकाचे स्वागत करत त्यांना शहरातील स्वच्छतेचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न होत असला तरी कल्याण रेल्वे स्थानकातच पाहुण्याचे अस्व्छ्तेने नागरिकांचे स्वागत होते.
तर रस्त्याच्या कडेला जागोजागी फेकला जाणारा आणि वेळ मिळेल तेव्हा उचलला जाणारा कचरा, भिंतीवर मारल्या जाणारा गुटखा, पानाच्या पिचकाऱ्या यामुळे शहराला बकाल स्वरूप आल्याचे दिसते . याचा एकत्रित परिणाम शहराचे मानांकन घसरण्यात झाल्याचे दिसत आहे. मागील वर्षी २०२३-२४ मध्ये २२ व्या स्थानी असलेली महापालिका यंदा दोन अंकांनी घसरली आहे.
पालिका प्रशासनाने ८६ कोटी रुपये खर्चून शहरातील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने संकलित करून त्याची वाहतूक करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केला असून याखेरीज पालिकेच्या स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खर्च केला जात आहे. तर डम्पिंग हटविण्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेण्यात आला असून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला देखील करोडोचा मोबदला दिला जात आहे. त्यामुळे या चेन्नई पॅटर्नचा आदर्श कल्याण डोंबिवली शहराला कुठे नेणार हे वर्षभरात स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.